अभिनव चित्ररथातून नवी मुंबई महानगरपालिका करणार 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' चा प्रचार आणि प्रसार
मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात 'नागरिकांचा प्रतिसाद' क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून मानांकीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' बाबत जागरुकता निर्माण व्हावी याकरिता महानगरपालिका परिक्षेत्रात ठिकठिकाणी फिरून जनजागृती करण्यासाठी स्वच्छता प्रचार रथ बनविण्यात आला आहे.
या प्रचार वाहनाचा शुभारंभ महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी उप महापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयु्क्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समिती सभापती श्री. नवीन गवते, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, नगरसेवक श्री. अनंत सुतार, श्रीम. अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उप आयुक्त श्री. नितीन काळे, श्री. अमोल यादव, श्रीम. क्रांती पाटील, सहा. संचालक नगररचना श्री. हेमंत ठाकुर, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी स्वच्छता रथाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सर्व भागात स्वच्छता संदेश प्रसारित केला जाईल व नागरिकांमध्ये सक्रीय सहभागाची जाणीव निर्माण केली जाईल असा विश्वास व्यक्त केला. या वर्षीच्या सर्वेक्षण प्रक्रियेत पहिल्या सहा महिन्यातील जाहीर नामांकनात देशात असलेला तिसरा क्रमांक उंचावण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी देशातील सर्व शहरे सर्वेक्षणात सहभागी झालेली असल्याने आपण मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असून यासाठी स्वच्छता वाहन चांगले काम करेल असे सांगितले. 'थ्री आर' चा वापर करून आपण कच-यात फेकल्या जाणा-या वस्तू पुनर्वापरात आणू शकतो ही संकल्पना जनतेमध्ये रुजविण्याची गरज असून या दृष्टीने या वाहनावरील कचरासुराला चेंडूने मारल्यास लोकांमध्ये व विशेषत्वाने मुलांमध्ये कच-याचा नायनाट करण्याचा संदेश मोठ्या प्रमाणावर पोहचेल असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबईचे नागरिक सर्वेक्षणात आपला सक्रीय सहभाग देतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
स्वच्छतेच्या जनजागृतीपर अभिनव प्रचार रथावर कचरासूराची प्रतिकृती बनविण्यात आली असून त्याला चेंडू मारल्यावर तो निश्चित ठिकाणी लागल्यास कचरासूराचा नाश केल्याबद्दल बक्षिस देण्यात येणार आहे. महापौरांना असे बक्षिस आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याव्दारे खेळाच्या स्वरुपात मनोरंजनाव्दारे कचरामुक्तीचा संदेश प्रसारित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे या वाहनावर एल.ई.डी. स्क्रीनव्दारे कचरा निर्मुलनाविषयी जनजागृतीपर संगीतमय क्लीप्स प्रसारित केल्या जाणार आहेत. आकाशी निळ्या रंगात सजविलेले हे वाहन लक्षवेधी असून त्यावर ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा यांचे प्रतिकात्मक डबेही नागरिकांच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत.
यावेळी आरंभ क्रिएशन या संस्थेने 'एक पाऊल स्वच्छतेकडे' या विषयावर मिलिंद खानविलकर लिखित व दिग्दर्शित मनोरंजन व प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. हा प्रचाररथ संपूर्ण नवी मुंबईत फिरून चौकाचौकात, गल्लीगल्लीत स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणार आहे.
Published on : 03-01-2020 12:05:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update