राहणीमान सुलभता निर्देशांक (Ease of Living Index) परीक्षणात 'नागरिक प्रतिसाद' देण्याचे आवाहन
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील मोठ्या शहरांमधील “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्या अनुषंगाने शहरांचे परीक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये, जीवनमान गुणवत्ता (V Quality of Life), आर्थिक क्षमता (Economic Ability), सेवांमधील सातत्य (Sustainability)' या निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणात पाणी, वीज, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, निवास सुविधा, सुरक्षा, पर्यावरण, मनोरंजन, शिक्षण, वाहतूक, राहणीमान स्तर, हरित जागांची उपलब्धता अशा विविध निकषांवर आधारित सर्वेक्षण केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अत्याधुनिक व दूरदृष्टीचे नियोजन असलेल्या पाणीपुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, उद्याने, मैदाने, सार्वजनिक वाहतुक, लोककल्याणकारी उपक्रम अशा विविध सेवा-सुविधांमुळे नेहमीच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत झाली आहे. निवासयोग्य शहरांमध्ये देशात व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई नावाजली गेली असून स्वच्छ सर्वेक्षणातही राज्यात नेहमीच सर्वोत्तम राहिली आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्येही 2019 च्या सर्वेक्षणात नवी मुंबई सातव्या क्रमांकावर व यावर्षी सहा महिन्यांच्या सर्वेक्षण टप्प्यात देशात तिस-या क्रमांकावर नामनिर्देशित आहे. या यशस्वी वाटचालीत नवी मुंबईकर नागरिकांच्या नेहमीच सक्रीय सहभाग अत्यंत महत्वाचा राहिला असून त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 'नागरिकांचा प्रतिसाद' क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेला देशात सर्वोत्तम शहराचे मानांकन लाभले आहे.
केंद्र सरकारमार्फत होत असलेल्या “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” परीक्षणातही नागरिक प्रतिसादाला (Citizen Feedback) महत्व देण्यात आले असून त्याला 100 पैकी 30 गुण आहेत. 29 फेब्रुवारीपर्यंत नागरिक https:/eol2019.org/cirizenfeedback या लिंकवर जाऊन आपला नवी मुंबई शहराविषयीचा अभिप्राय नोंदवू शकतात.
नवी मुंबई शहराचे नागरिक म्हणून शहराविषयी असलेले प्रेम आणि अभिमान येथील नागरिकांच्या प्रत्येक समाजपयोगी उपक्रमांतील व्यापक स्वरूपातील सहभागातून नेहमीच प्रदर्शित होत असल्याचे दिसून येत असून नवी मुंबई शहर अधिकाधिक उत्तम होण्याकरिता येथील नागरिक जागरूक असतात. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत होत असलेल्या “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” परीक्षणातही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद देऊन (Citizen Feedback) शहराविषयीच्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे नोंदवावीत व नवी मुंबई शहराला देशात अग्रणी बनविण्यासाठी योगदान द्यावे त्याचप्रमाणे आपल्या फेसबुक व ट्विटरवरील प्रतिक्रियांसोबत शेवटी #MyCityMyPride हा हॅशटॅग जोडावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-02-2020 11:09:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update