आर्थिक सक्षमतेच्या राष्ट्रीय ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग सहाव्यांदा मानकरी
"इंडिया रेटींग अँड रिसर्च" (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस "इंडिया डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)" हे पत मानांकन सन 2019-20 करीता जाहीर झाले आहे. अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने सहाव्या वर्षी मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.
देशातील निवासयोग्य शहरांमध्ये देशातील दुस-या क्रमांकाचे शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या सेवासुविधांच्या दर्जाकडे ज्याप्रमाणे बारकाईने लक्ष दिले जाते त्याचप्रमाणे महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही नेहमीच काटेकोर लक्ष दिले जाते. त्यामुळेच सर्व बाबींचा समतोल राखला जात असल्याने अशाप्रकारचे आर्थिक पत मानांकन सातत्याने मिळत असून ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मागील आर्थिक वर्षात कोव्हीड 19 चा प्रभाव सुरू झालेला असताना व मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अंतिम कालावधीत पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर झालेला असतानाही कर वसूलीची उत्तम कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम झालेली आहे. डिसेंबर 2019 पासून थकीत मालमत्ताकर धारकांना दिलासा देणा-या 'मालमत्ताकर अभय योजना' प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात करण्यात आली. विविध करांव्दारे प्राप्त होणा-या निधीमधूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे यामुळेच शक्य झाले आहे.
सन 2019-20 या आर्थिक वर्षात कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त करणा-या देशातील 4 शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई हे एकमेव शहर ठरले तसेच 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये राज्यात सर्वप्रथम व देशात तिस-या क्रमांकाचा बहुमान नवी मुंबईस प्राप्त झाला. निवासयोग्य शहरांमध्येही देशातील व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई मान्यताप्राप्त ठरले.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड यांनी आपल्या सहका-यांसह महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले आहे. करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि योग्य बाबींवरच खर्च करण्याचे काटकसरीचे धोरण हा प्रमुख भाग आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ या अभिनव प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली असून पेपरलेस व गतीमान प्रशासन प्रभावीपणे राबविले जात आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही थकीत कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही.
यापुढील काळातही कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च ही पध्दत कायम राखली जाणार आहे. त्यामुळे "इंडिया रेटींग अँड रिसर्च" या नामांकीत संस्थेमार्फत “इंडिया AA+ Stable" हे सातत्याने सहाव्या वर्षी लाभलेले पत मानांकन कायम राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे.
Published on : 06-10-2020 12:46:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update