कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेत नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेत राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या 3,16,449 कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त राज्यात सर्वाधिक चांगले काम केलेले आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणा-या या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने 3,35,469 कुटुंबांमधील 10,53,896 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही कामगिरी राज्यात सर्वोत्तम आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकात 2 ते 3 करोनादूतांचा समावेश असलेली 670 पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान तसेच ऑक्सिजन पातळी तपासून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याची माहिती शासनाच्या ॲपमध्ये नोंदवित आहेत. तसेच कोणत्या व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय याबाबतचीही माहिती संकलित केली जात आहे.
यासोबतच घरातील सर्व नागरिकांना कोरोनापासून बचावाची तंत्रे सांगितली जात असून त्यामध्ये प्रामुख्याने नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असल्यास नियमित औषधोपचार घेणे, एखादा कोरोनाबाधित बरा झाला असल्यास इतरांच्या आरोग्य हितासाठी त्यांना प्लाझमा डोनेशनसाठी प्रोत्साहित करणे अशा विविध प्रकारची माहिती देत व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात आहे.
पहिल्या टप्प्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पाही राबविला जाणार असून या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन दुस-यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्यावेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणातून संकलीत होणा-या माहितीच्या आधारे लक्षणे आढळणा-या नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे सर्वेक्षणात आढळलेल्या सहव्याधी (कोमॉर्बिड) असणा-या अथवा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. याव्दारे 'मिशन ब्रेक द चेन' ची त्रिसूत्री म्हणजे जलद रूग्णशोध (ट्रेस) व त्यांची तपासणी (टेस्ट) होऊन त्वरित उपचार (ट्रिट ) सुरू झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत होत आहे.
सर्व चांगल्या कामात उत्तम सहकार्य करणा-या नवी मुंबईकर नागरिकांनी मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेलाही चांगले सहकार्य केले. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची राज्यात सर्वोत्तम कामगिरी आपण करू शकलो त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या मोहिमेच्या 14 ऑक्टोबर पासून सुरू होणा-या दुस-या टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणालाही नागरिकांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तसेच मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे या तीन गोष्टींची नियमित सवय लावून आपल्यामुळे आपल्या प्रिय कुटुंबियांना व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आवाहन करण्यात येत आहे.