कोरोना प्रादुर्भावात घट होतेय पण सावधगिरी गरजेचीच
श्रीगणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात वाढू लागलेले कोव्हीड 19 चे प्रमाण ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कमी होताना दिसत असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होण्याचा आलेख आणखी घटत चाललेला दिसून येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राबविलेल्या विविध उपाययोजना आणि त्याला नागरिकांचा लाभलेला चांगला प्रतिसाद याचा हा परिणाम असून ही नवी मुंबईकरांसाठी दिलासाजानक गोष्ट आहे. मात्र असे असले तरी जोपर्यंत कोरानावर लस सापडत नाही तोपर्यंत आरोग्य सुरक्षेची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या कोव्हीड 19 चाचण्यांचे प्रमाण पूर्वीइतकेच दिवसाला 2 हजारहून अधिक असून रूग्णसंख्या मात्र घटताना दिसत आहे ही चांगली बाब असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 8 तारखेपर्यंत 17,003 चाचण्या करण्यात आल्या असून आत्तापर्यंतच्या एकूण चाचण्या 3 लाखांपर्यंत म्हणजे 2,98,970 इतक्या झालेल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे हे एकूण प्रमाण इतर मोठ्या शहरांपेक्षा अधिक आहे.
मागील 8 दिवसात 17,003 चाचण्यांमधून 955 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. करण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 5.61% इतका कमी झाल्याचे दिसून येत असून, जो सप्टेंबर महिन्यात 15.39% तसेच ऑक्टोबर महिन्यात 9.33% इतका होता.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 नोव्हेंबर पर्यंत एकूण 45476 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 43187 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 923 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 94.96 % हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.02 % हे प्रमाण सर्वोत्तम आहे.
'मिशन ब्रेक द चेन' संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करीत एखादा रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील 22 व्यक्ती शोधून त्यांची तपासणी केली जात आहे, याचाही सकारात्मक परिणाम रूग्णसंख्येत घट होण्यात झालेला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोनातून बरे होणा-या रूग्णांचे प्रमाण सतत वाढत गेलेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस 32325 रूग्ण ( 88.14 %) बरे होऊन घरी परतले होते. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण वाढत जाऊन 41803 रूग्ण (93.90 %) बरे होऊन घरी परतण्यापर्यंत पोहचले होते. त्यात अधिक वाढ होत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 43187 (94.96 %) रूग्ण बरे होऊन घरी परतण्याइतके हे प्रमाण वाढले आहे. .
त्याचप्रमाणे रूग्णसंख्येची वाढही नियंत्रणात दिसत असून 30 सप्टेंबरपर्यंत 79 तसेच 31 ऑक्टोबर पर्यंत 239 दिवसांवर असलेला रूग्णदुपटीचा कालावधीही ( Doubling Rate ) 8 नोव्हेंबर पर्यंत एका आठवड्यात 319 दिवसांवर पोहचलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 नोव्हेंबर रोजी 1366 (3.00%) इतकेच रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून 31 ऑक्टोबर रोजी उपचार घेत असलेल्या 1817 (4.08 %) कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रूग्णांच्या तुलनेत रूग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे.
हे चित्र समाधानकारक असले तरी यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. कारण युरोपमध्ये आलेल्या दुस-या लाटेचे उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरानाची लस सापडत नाही तोपर्यंत मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे हीच बचावाची त्रिसूत्री आहे.
या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांविरोधात दक्षता पथकांव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र अशा कटू कारवाईची वेळ येऊ न देता नागरिकांनी स्वत:च्या व आपल्या संपर्कात येणा-या नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
तरी दिवाळी या आपल्याकडील सर्वात मोठ्या सणाच्या कालावधीत खरेदीसाठी वा इतर महत्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडायचे झाल्यास आपल्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही व आपण गर्दीत जाणार नाही याची दक्षता घेऊन प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टन्सींग, सतत हात धुणे या आरोग्य सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-11-2020 11:53:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update