कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून आरोग्यसंपन्न दिवाळी साजरी करूया - आयुक्त श्री. अभिजीत बांगर
‘प्रकाशाचा सण' म्हणून साजरा केला जाणारा दिवाळी सण यंदा कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असून नागरिकांनी उत्सव साजरा करण्याचा उत्साह कायम राखत आपल्या निष्काळजीपणामुळे कोव्हीडचा प्रसार होऊ नये याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे यावर्षी दिवाळी साजरी करताना प्रत्येकाने स्वत:च्या व संपर्कातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेत आत्तापर्यंतचे इतर सण जसे साधेपणाने व आरोग्याची काळजी घेत साजरे केले तसेच हा दिवाळी सणही साधेपणाने साजरा करावा असे राज्य शासनामार्फत परिपत्रकाव्दारे सूचित करण्यात आलेले आहे.
शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत उत्सव कालावधीत नागरिकांनी गर्दी टाळावी. मास्क, सोशल डिस्टन्सींग, हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे. महत्वाचे म्हणजे फटाक्यांच्या धूराचा त्रास 'कोविड - १९' बाधित रुग्णांना होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावेत व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व नागरिकांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेऊन जलद रूग्णशोध (ट्रेस), तत्पर तपासणी (टेस्ट) व त्वरित उपचार (ट्रिट) या त्रिसूत्रीचा अंगिकार करीत तसेच कोरोनाबाधित सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील साधारणत: 24 पर्यंत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. अशा नियोजनबध्द उपाययोजनांमुळे तसेच महानगरपालिका करीत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचे चांगले सहकार्य लाभल्यामुळे सध्या कोव्हीड - 19 नियंत्रणात येत असल्याचे दररोजच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. हे चित्र समाधानकारक दिसत असले तरी कोव्हीड-19 च्या संसर्गाचे प्रमाण जलद व अधिक असल्याने जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत प्रत्येकाने काटेकोर काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
याकरिता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी आवर्जुन मास्क परिधान करणे, परस्परांमध्ये सुरक्षित कटाक्षाने राखणे तसेच वारंवार साबणाने योग्यप्रकारे हात धुणे या 3 महत्वाच्या गोष्टी आपल्या नियमित सवयीच्या बनविणे अत्यंत आवश्यक आहे.
दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रीकरण (Social Gathering) टाळण्यात यावे आणि काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे. त्यातही ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे.
यावर्षी कोव्हीड 19 च्या काळातील दीपावली सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असून मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे या तीन गोष्टींचे न विसरता पालन करून दिवाळी महोत्सवातील आनंद वृध्दींगत करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 11-11-2020 07:50:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update