*‘माझी वसुंधरा अभियान’ 2021-22 मध्ये नवी मुंबई राज्यात नंबर वन* *रू.10 कोटी रक्कमेचे प्रथम पारितोषिक*

*महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने मागील वर्षीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या 'माझी वसुंधरा अभियान २०२१-२२' यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान लाभला. प्रथम पुरस्काराची रू.10 कोटी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान केली जाणार आहे.*
*आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार, महसूल मंत्री ना.श्री. बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव श्रीम.मनिषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार स्विकारला.*
मागील वर्षी ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये नवी मुंबई राज्यातील व्दितीय क्रमांकाचे मानांकित शहर ठरले होते. यावर्षी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून महानगरपालिका अभियानास सामोरी गेली आणि आपले गतवर्षीचे मानांकन एकने उंचावत राज्यातील सर्वोत्तम पर्यावरणपूरक शहराचे मानकरी ठरले.
*महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार सर्व नवी मुंबईकर नागरिकांच्या एकत्रित सहयोगाला समर्पित केला असून यामध्ये लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व मंडळे, अधिकारी, विशेषत्वाने स्वच्छता, उद्यान आणि विविध विभागांतील कर्मचारी, प्रसारमाध्यमे यांच्या एकत्रित सहयोगाचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. या यशाबद्दल आयुक्तांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करीत अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मागील 2 वर्षात दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.
यामध्ये सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पध्दतीने केलेल्या शहरी जंगल निर्मितीप्रमाणेच यावर्षी सेक्टर 28 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पध्दतीने 1 लक्ष 23 हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आलेला हा देशातील सर्वात मोठा मियावाकी पध्दतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे.
महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी वृक्षलागवड ही पूर्णत: देशी प्रजातींच्या वृक्षांची असून फळे व फुले येणा-या या देशी वृक्षराजीमुळे पशू व पक्ष्यांना पूरक वातावरण तयार होऊन शहराच्या जैवविविधतेत लक्षणीय भर पडणार आहे.
या सोबतच रस्त्याच्या कडेला 24 हरित क्षेत्रे विकसित करण्यात आली असून मोकळ्या जागा तसेच व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना ठिकठिकाणी मुख्य चौकात राबविण्यात आलेली आहे. वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध होण्याकरिता महानगरपालिकेच्या स्वत:ची रोपवाटिका निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन निर्माण होणा-या 100 टक्के कच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात असून कच-याचे 3 प्रकारे वर्गीकरण व मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, वसाहती, संस्था यांच्या ओल्या कच-यावर निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणारे प्रकल्प राबविले जात आहेत.
‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही संकल्पना राबवित विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असून त्यामध्ये लोकसहभाग घेतला जात आहे. टाकाऊपासून टिकाऊ 148 शिल्पाकृती निर्माण करून शहर सुशोभिकरणात लक्षणीय भर घालण्यात आली आहे.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये याकरिता नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमाही प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे.
'थ्री आर' अर्थात कच-याचा पुनर्वापर (Reuse), कचरा निर्मितीत घट (Reduce) व कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात असून ‘ग्रीनसोल’ उपक्रमांतर्गत 1 लाखाहून जुने वापरात नसलेले बूट / चप्पल यांचे संकलन करून व त्यांचे नुतनीकरण करून गरजूंना वितरण करण्यात आले आहे. प्लास्टिकचे रॅपर्स व लहान तुकडे प्लास्टिक बाटल्यांतून विद्यार्थ्यांमार्फत साठवून प्लास्टिमॅन उपक्रमांतर्गत प्रतिमहा 800 प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात येत आहे.
प्रायोगिक तत्वावर 5 झोपडपट्ट्यांमध्ये कचरा संकलित करून त्याची तिथेच कम्पोस्ट पीट्स करून विल्हेवाट लावली जात असून याव्दारे कचरा वाहतुकीच्या खर्चात बचत होत आहे तसेच महिलांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे.
तलावांची नियमित स्वच्छता राखली जात आहे. त्याचप्रमाणे नाले स्वच्छ रहावेत यादृष्टीने नाल्यांच्या काठांवर उंच जाळ्या बसवून नागरिकांनी थेट नाल्यात कचरा टाकू नये यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. नाल्यांमध्ये स्क्रीन्स बसवून त्याठिकाणी वाहणारा कचरा असल्यास तो एके ठिकाणी अडकून तो नियमित साफ करण्याची प्रणाली राबविण्यात येत आहे.
वायू प्रदूषण रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून हवेतील दूषित घटकांचे प्रमाण कमी करण्याप्रमाणेच हवा गुणवत्ता निरीक्षण करून त्यामध्ये सुधारणेसाठी आवश्यक उपायोजना राबविल्या जात आहेत.
बांधकाम व पाडकाम कचरा अर्थात डेब्रिजची सर्वच शहरांना भेडसाविणारी समस्या मार्गी लावण्यासाठी तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी अत्याधुनिक शास्त्रोक्त पध्दतीने बांधकाम व पाडकाम कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविला जात आहे.
सायकलसारख्या प्रदूषणविरहित वाहनाचा नागरिकांकडून प्रभावी रितीने वापर केला जात असून युलू सायकल सुविधेचा वापर करून 2018 नोव्हेंबरपासून 35 लाख किमी राईड्स झालेल्या आहेत. 600 युलू सायकल आणि 180 ई बाईक्स प्रवासी सेवेत कार्यान्वित असून 35 कोटी ग्रॅम्सपेक्षा अधिक कार्बन फूटप्रिटंची बचत झालेली आहे. सार्वजनिक सायकल सेवेचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर करणारे नवी मुंबई हे देशातील अग्रगण्य शहर आहे. शहरात 15 किमी सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने फेम 2 अंतर्गत 20 ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जींग स्टेशन्स व त्यामध्ये 120 चार्जींग पॉईंट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कारंजे, उद्याने, बसडेपो आणि औद्योगिक वापरासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर केला जात असून त्याव्दारे पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
अत्याधुनिक मलप्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रियाकृत 45 द.ल.लि. पाण्यावर टर्शिअरी ट्रिटमेट करून ते टर्शिअरी प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना पुरविण्यात येणार आहे. तशा प्रकारचा करार एमआयडीसी सोबत झालेला आहे.
एलईडी आणि सौर दिवे बसवून विजेचा वापर कमी केला जात आहे तसेच सरकारी इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येत आहेत तसेच ऊर्जा ऑटिड करण्यात येत आहे.
विहिरींचे पुनरज्जीवन करणे तसेच पर्जन्य जलसाठ्यावर भर दिला जात आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग रहावा यादृष्टीने पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर केला जात असून त्यासोबतच स्वच्छता मोहीमा, प्लास्टिक प्रतिबंध मोहीमा, चित्रकला, जिंगल, शॉर्टफिल्म व इतर स्पर्धांचे आयोजन, माझी वसुंधरा सामुहिक शपथ ग्रहण, चित्रभिंती व शिल्पाकृतींव्दारे शहर सौदर्यीकरणावर भर असे विविध माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम राबविले जात आहेत.
*नवी मुंबई ही स्वच्छतेप्रमाणेच निसर्गातील भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वांच्या संवर्धनासाठी जागरूकतेने काम करीत असून त्यामध्ये नवी मुंबईकर पर्यावरणप्रेमी नागरिकांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. याचेच फलित म्हणजे माझी वसुंधरा अभियानात राज्यातील प्रथम क्रमांकाच्या शहराचा हा बहुमान असून हा पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित असल्याची भावना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली आहे.*
Published on : 05-06-2022 14:33:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update