स्वच्छताकर्मींची संवेदना जाणून घेत कोपरखैरणे व नेरूळ विभागातील हजारो नागरिक स्वच्छतेसाठी रस्त्यावर

स्वच्छता कामगारांचा सन्मान करीत त्यांना नेहमीच्या शहर स्वच्छतेच्या कामापासून एक दिवसाची मुक्तता देत त्यांच्या कामाची जबाबदारी नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वत: स्विकारण्याचा अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ आणि कोपरखैरणे विभागात यशस्वीरित्या संपन्न झाला.
या महास्वच्छता अभियानात सकाळी 6.30 वाजल्यापासून कोपरखैरणे व नेरुळ विभागात हजारो स्वच्छताप्रेमी नागरिक स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यारस्त्यांवर उतरले आणि या दोन्ही विभागांमध्ये जणू स्वच्छतेची लाट निर्माण झाली. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे व नेरुळ विभागाचे विभाग अधिकारी श्री. सुनिल पाटील तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रशांत गावडे हे देखील नागरिकांसमवेत या स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभागी झाले व महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून बघता बघता रस्ते, चौक स्वच्छ झाले.
‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, एक दिवस स्वच्छताकर्मीच्या सन्मानाचा’ हे ध्येय वाक्य नजरेसमोर ठेवून वाशी व बेलापूर विभागाच्या पावलावर पाऊल टाकीत कोपरखैरणे व नेरुळ विभागात हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी व प्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा – महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी, मॉल्स, हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे मालक व कर्मचारी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. कोपरखैरणे विभागात 2400 हून अधिक नागरिक तसेच नेरुळ विभागात 3250 हून अधिक नागरिक यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे घोषवाक्य स्वकृतीतून सिध्द केले.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला आजवर मिळालेल्या राष्ट्रीय सन्मान पुरस्कारांमध्ये दैनंदिन स्वच्छतेचे कर्तव्य सेवाभावी वृत्तीने पार पाडणा-या स्वच्छताकर्मींच्या समर्पित भावनेने केलेल्या कामाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान केला जावा व ते करीत असलेल्या कामाची अनुभूती घेता यावी या दोन्ही दृष्टीने हा महास्वच्छता अभियानाचा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून यामुळे स्वच्छताकर्मींची सहसंवेदना जाणून घेता आली अशी भावना अनेक नागरिकांनी अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर व्यक्त केली.
कोपरखैरणे विभागात यावेळी डी - मार्ट सर्कल ते रा.फ.नाईक शाळा ते से. 8 ते से. 5 रेल्वेस्टेशन ते अण्णासाहेब पाटील सभागृहपर्यंत 340 हून अधिक स्वच्छताकर्मींनी रॅली काढून स्वच्छतेचा प्रचार केला. कचरा वर्गीकरणाचे महत्व, प्लास्टिक प्रतिबंधाची गरज, ओल्या कच-याची कम्पोस्ट बास्केट वापरून घरच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारात कम्पोस्ट पीट्सव्दारे विल्हेवाट अशा स्वच्छताविषयक अनेक महत्वाच्या गोष्टींविषयी फलक उंचावत तसेच घोषणा देत स्वच्छताकर्मींनी जनजागृती केली.
नेरुळ विभागातही 540 हून अधिक कामगारांनी सेक्टर 3 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 समोरून अय्यप्पा मंदीर मार्गे सेक्टर 19 येथील आर.आर.पाटील उद्यानापर्यंत स्वच्छता जनजागृती रॅली काढून नागरिकांना स्वच्छतेचे महत्वा पटवून दिले.
या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करताना त्या विभागातील स्वच्छताकर्मींना नेहमीच्या कामापासून मुक्तता देऊन त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेहासाठी रक्ततपासणी, बी.एम.डी. तपासणी, नेत्रतपासणी, ई.सी.जी. तसेच दंतचिकित्सा अशा विविध प्रकारच्या तपासण्या हार्ट फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. इलीस जयकर यांच्या सहयोगाने, मेडिकव्हर हॉस्पिटल व ड्रीम ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या.
कोपरखैरणे विभागातील महास्वच्छता अभियानाचे स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश वाघुळदे यांनी व्यवस्थित नियोजन केले. त्यांच्यासह स्वच्छता निरीक्षक श्री. रविंद्र चव्हाण, श्री. महेंद्र महाडिक, श्री. दिनेश पाटील, श्री. सम्राट कांबळे, श्री. शंकर पाटील यांनीही हे अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
अशाच प्रकारे नेरुळ विभागातील महास्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक श्री. अरूण पाटील, श्रीम. जयश्री उगले. श्री. विरेंद्र पवार, श्री. निलेश पाटील यांनी सुव्यवस्थित नियोजन केले.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा देशातील क्रमांक उंचाविण्यासाठी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून सूत्रबध्द वाटचाल सुरु असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविताना त्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. त्यापुढे जात नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन स्वच्छताकर्मींच्या सेवाभावी कामाचा सन्मान करीत त्यांना एक दिवस त्यांच्या स्वच्छतेच्या कामापासून सुटका देत स्वत: झाडू हातात घेऊन संवेदनशीलता दाखविणे ही नागरिकांच्या मनातील आपुलकीची भावना दर्शविणारी अत्यंत महत्वाची गोष्ट असून यामधून नवी मुंबईच्या स्वच्छताप्रेमी एकात्म संस्कृतीचे दर्शन घडते आहे.
Published on : 24-01-2023 10:26:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update