मित्र सहयोग ठाणे यांचे "गोष्ट जीवाची" बालनाट्य नवी मुंबई महापौर चषकाचे राज्यस्तरीय मानकरी शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान प्रस्तुत "तळमळ एका अडगळीची" नवी मुंबईतून सर्वोत्कृष्ट
एकेकाळी येथील गावागावात नाट्य चळवळ उभी राहिली असून त्यावेळच्या आठवणींना उजाळा देत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबई शहरातील कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका सतत उपक्रमशील राहिल असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबईतील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना इतरही गावांतील कलावंतांच्या गुणवत्तेचे दर्शन व्हावे याकरिता नवी मुंबई महापौर चषकांतर्गत राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सांगत कोल्हापूर, नाशीक, सातारा, पुणे, दापोली, रायगड, मुंबई अशा महाराष्ट्राच्या विविध भागातील 35 बालनाट्य समूहांनी उत्साहाने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या नवी मुबंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा महाअंतिम सोळ्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते श्री. सुनिल बर्वे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. गणेश म्हात्रे, स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परिक्षक सुप्रसिध्द दिग्दर्शक श्री. मंगेश कदम, नामवंत अभिनेते श्री. पंढरीनाथ कांबळे, नामांकित अभिनेत्री श्रीम. अंकिता जोशी पनवेलकर, प्राथमिक फेरीचे परिक्षक अभिनय कट्टा चळवळीचे सर्वेसर्वा दिग्दर्शक श्री. किरण नाकती, परिवहन समितीचे माजी सभापती श्री. प्रदिप गवस, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अभिनेते श्री. सुनिल बर्वे यांनी नाटक ही जिवंत कला असल्याचे सांगत या बालनाट्य स्पर्धेतून कलाविष्काराची संधी मुलांना लहान वयातच उपलब्ध करून देत असल्याबद्दल महापौरांचे व महानगरपालिकेचे कौतुक करीत यातून उत्तम प्रेक्षकही तयार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बालनाट्य म्हणजे लहानांच्या नजरेतून मोठ्यांचा कान पिळण्याची चांगली संधी असल्याचे आजच्या बालनाट्यांच्या विषयातून दिसून आल्याचे सांगत श्री. सुनिल बर्वे यांनी सहभागी संस्थांची प्रशंसा केली.
परीक्षकांच्या वतीने प्रातिनिधीक मनोगत व्यक्त करताना सुप्रसिध्द दिग्दर्शक अभिनेते श्री.मंगेश कदम यांनी आज सादर झालेल्या बालनाट्यातून वैश्विक विषयांचे दर्शन होण्याबरोबरच आजूबाजूच्या विद्यमान परिस्थितीकडेही जागरुकतेने बघितले जात असल्याचे दिसून आल्याने अचंबित झालो अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. नाटकांच्या विषयांतून चांगले संस्कार रूजविले जात असल्याचे सांगत सर्वच समूहांच्या सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी नवी मुंबई शहराचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे सांगत महापौर चषकांतर्गत होणा-या विविध उपक्रमांना सतत वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून उत्साह वाढतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
गोष्ट जिवाची या मित्र सहयोग ठाणे या संस्थेने सादर केलेल्या बालनाट्यास रु.25 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सर्वोत्कृष्ट बालनाट्य म्हणून गौरविण्यात आले. सेक्रड हार्ट हायस्कूल कल्याण यांच्या बदला या बालनाट्यास व्दितीय तसेच उत्कर्ष मंदिर मालाड मुंबई यांच्या वारी या बालनाट्यास तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे 20 व 15 हजार रक्कमेचे पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आले.
जोकर हे पार्ले टिळक विद्यालय मुंबई, यांचे बालनाट्य उत्तेजनार्थ प्रथम आणि मोठेपण देगा देवा हे संदेश विद्यालय मुंबई यांचे बालनाट्य उत्तेजनार्थ व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांस प्रत्येकी 5 हजार रक्कमेचे पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आले.
तळमळ एका अडगळीची हे शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था नवी मुंबई यांनी सादर केलेले बालनाट्य नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या विशेष विभागात सर्वोत्कृष्ट बालनाट्य ठरले त्यास रु, 10 हजार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह देण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून श्री. संजय शिंदे (वारी), श्री. सुरेश शेलार (बदला) व श्री. सुमित तांबे (नोकर) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून श्रीम. गिरीजा राऊत (अप्पुराजा), श्रीम. कावेरी जगताप (संगीत वात्सल्य), श्रीम. रिद्धी साळवी (मोठेपणा देगा देवा) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून श्री. हर्ष काटे (बदला), श्री. चेतन वाघ (मोठेपण देगा देवा), श्री. वरद पाटील (अप्पू राजा)) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून लेखक (गोष्ट जीवाची), श्री. सुरेश शेलार (बदला), श्री. संजय शिंदे (वारी) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना म्हणून श्री. अमित घाडीगावकर (वारी), श्री. वैभव पिसाट (जोकर) श्रीम. कविता देसाई (अप्पु राजा) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट नेपथ्य म्हणून श्री. अदित्य कोदे व श्री. वरद गाडगीळ (अप्पु राजा), नेपथ्यकार (बदला), श्री. रंगनाथ गोडे व श्री. नितीन महाजन व श्री. मयुरेश भांडारकर (वारी) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट संगीत म्हणून श्री. निहार शेंबेकर (जोकर), श्री. मनिषा पंडित, श्री. संतोष घाडी व श्री. दिपेश मोरे (वारी) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट रंगभूषा म्हणून रंगभूषाकार (तळमळ एका अडगळीची), श्रीम. नेहा जंगम व श्रीम. प्रिया गावित (वारी), श्रीम. पूनम पाटील (संगीत वात्सल्य) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून श्री. प्रज्योत महाजन (तळमळ एका अडगळीची), श्री. साई कुलकर्णी (संगीत वात्सल्य), श्रीम. नेहा जंगम, श्रीम. प्रिया गावित (वारी) यांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिके प्रथम क्रमांकासाठी रु.1 हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रु.750/- व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकासाठी रु.500/- व प्रमाणपत्र अशा स्वरुपात वितरीत करण्यात आली.
याशिवाय प्राथमिक फेरीत सर्व सहभागी 35 बालनाट्य संस्थांना सहभाग प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच प्राथमिक फेरीतील उत्कृष्ट अभिनय करणारे कलावंत प्रथम अंगचेकर, मानसी कराड, ज्ञानेश्वरी सातपूते, मैत्रेयी खरे, संस्कृती शिंदे, आरोही कुलकर्णी, युगा कुलकर्णी, प्रथम देशपांडे, तन्मय देशपांडे, श्रेया कदम, विघ्नेश इथापे, स्तुती ठाकुर, राज ठकुरे, शुभम साळुंखे, राजू काबरे, मृणाल काशीद, रुची पवार, भार्गव गोरुले, शर्व दाते, अवंती कुलकर्णी यांना उत्तेजनार्थ अभिनय पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय प्रारंभ संस्थेने सादर केलेल्या दिव्यांग मुलांचा समावेश असलेल्या चांभार चौकशीचे नाटक या बालनाट्यातील सर्व कलावंतांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. प्रारंभच्या कलावंतांचा सन्मान होत असताना उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या दिव्यांग कलावंतांना अभिनंदनाची मानवंदना दिली.
29 ते 31 जानेवारी या कालावधीत 35 बालनाट्य संस्थांच्या सहभागासह पार पडलेली प्राथमिक फेरी व त्यामधून निवडक आठ बालनाट्यांची महाअंतिम फेरी यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या बालनाट्य संस्थांनी विविध विषयावरील सादरीकरण करत नवी मुंबईत नाट्य जल्लोष केला.
Published on : 06-02-2020 10:56:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update