निवासयोग्य शहरात नवी मुंबईच्या अग्रक्रमासाठी 'नागरिक प्रतिसाद' देण्याचे आवाहन
![DSC_0162.JPG DSC_0162.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2020/02/mediafiles/DSC_0162.JPG)
नवी मुंबईच्या यशस्वी वाटचालीत नवी मुंबईकर नागरिकांचा नेहमीच मोलाचा सहभाग राहिला असून येथील दर्जेदार सोयीसुविधांमुळे राहण्यायोग्य नवी मुंबई नेहमी देशात अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे देशातील विविध शहरांचे राहणीमान सुलभता निर्देशांक परिक्षण केले जात असताना नवी मुंबईकर नागरिक शहराविषयीच्या आपल्या भावनांना सकारात्मक प्रतिसाद देतील असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी सिटीझन फिडबॅकमध्ये शहराविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे द्यावीत असे आवाहन केले.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी राहणीमान सुलभता निर्देशांक परिक्षणाच्या अनुषंगाने माहिती देताना शिक्षण, आरोग्य, निवास व निवारा, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन, वाहतुक, सुरक्षा, मनोरंजन, आर्थिक विकास, आर्थिक विकासाच्या संधी, ऊर्जा बचत, पर्यावरण, पर्यावरणशील हरित इमारती असे बारा निकष असतील असे सांगितले. नागरीकरण हे विकासाचे निर्देशक असले तरी त्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. विशेषत्वाने सोयीसुविधांवर पडणारा ताण समतोल करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या बाबींकडे लक्ष देतानाच नागरिकांचे जीवन सुलभ व सुखकर करण्याकडे लक्ष पुरवावे लागते. शहराचा समाधानी निर्देशांक सतत वाढता राहिल याचीही काळजी घ्यावी लागते. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत सतर्कतेने काम करीत असून नागरिकांकडून तशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात व स्वच्छता अभियान असो की इतर कोणताही लोकोपयोगी उपक्रम असो, त्यामध्ये नागरिकांचा भरभरून सहभाग मिळतो. त्यामुळेच नवी मुंबईच्या राहणीमान सुलभता निर्देशांकाची पाहणी केली जात असताना नागरिक प्रतिसाद क्षेत्रातही नवी मुंबईकर नागरिक शहराबद्दल भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील मोठ्या शहरांमधील “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्या अनुषंगाने शहरांचे परीक्षण करण्यात येत आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमांर्फत जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार उपस्थित होते.
“राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” मध्ये, जीवनमान गुणवत्ता (V Quality of Life), आर्थिक क्षमता (Economic Ability), सेवांमधील सातत्य (Sustainability)' या निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अत्याधुनिक व दूरदृष्टीचे नियोजन असलेल्या पाणीपुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, उद्याने, मैदाने, सार्वजनिक वाहतुक, लोककल्याणकारी उपक्रम अशा विविध सेवा-सुविधांमुळे नेहमीच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत झाली आहे. निवासयोग्य शहरांमध्ये देशात व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई नावाजली गेली असून स्वच्छ सर्वेक्षणातही राज्यात नेहमीच सर्वोत्तम राहिली आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्येही 2019 च्या सर्वेक्षणात नवी मुंबई सातव्या क्रमांकावर व यावर्षी सहा महिन्यांच्या सर्वेक्षण टप्प्यात देशात तिस-या क्रमांकावर नामनिर्देशित आहे. या यशस्वी वाटचालीत नवी मुंबईकर नागरिकांच्या नेहमीच सक्रीय सहभाग अत्यंत महत्वाचा राहिला असून त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 'नागरिकांचा प्रतिसाद' क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेला देशात सर्वोत्तम शहराचे मानांकन लाभले आहे.
केंद्र सरकारमार्फत होत असलेल्या “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” परीक्षणातही नागरिक प्रतिसादाला (Citizen Feedback) महत्व देण्यात आले असून त्याला 100 पैकी 30 गुण आहेत. 29 फेब्रुवारीपर्यंत नागरिक https:/eol2019.org/cirizenfeedback या लिंकवर जाऊन आपला नवी मुंबई शहराविषयीचा अभिप्राय नोंदवू शकतात.
केंद्र सरकारमार्फत होत असलेल्या “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” परीक्षणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद देऊन (Citizen Feedback) शहराविषयीच्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे नोंदवावीत व नवी मुंबई शहराला देशात अग्रणी बनविण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे त्याचप्रमाणे आपल्या फेसबुक व ट्विटरवरील प्रतिक्रियांसोबत शेवटी #MyCityMyPride हा हॅशटॅग जोडावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 07-02-2020 14:15:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update