बंद, बेवारस वाहने हटविणेबाबत आवाहन
महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे दि. 9 ऑक्टोबर 2018 रोजीचे परिपत्रक तसेच नगरविकास विभागाचे दि. 14/09/2018 व दि.02/03/2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये बेवारस वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रस्त्यावरील तसेच पुलाखालील एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांची संख्या वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साफसफाईच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.
शहरातील सर्वच क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात बंद बेवारस वाहने ठिकठिकाणी मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठया प्रमाणात कचरा असल्यामुळे तो नियमित साफसफाई करता येत नाही. याबाबत महानगरपालिकेने नियमितपणे वाहने हटविणेबाबत नागरिकांना जाहीर आवाहन केलेले होते. मात्र, अदयापही नागरिकांनी बंद बेवारस अवस्थेत असलेली वाहने हटविलेली नाहीत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर बंद बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1945, मधील कलम 230 व 231 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत हटविण्यात आलेली वाहने महापालिकेच्या क्षेपणभूमी येथे जमा करण्यात येणार आहेत. ज्या मालकांची वाहने महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत यापूर्वी उचलण्यात आली असतील, अशा वाहनांच्या मालकांनी त्या त्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावयाचा आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर / पुलाखालील जागेत बंद / बेवारस स्थितीत असलेली वाहने तात्काळ हटवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 17-03-2020 16:36:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update