कोरोनाचा धोका टळलेला नसून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे - आयुक्त श्री. अभिजीत बांगर
मागील आठवडाभरातील कोरोना बाधीत रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घेतला तर राज्यभरात कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातही एकाच कुटुंबातील अनेकजण कोरोना बाधीत होत असल्याचे आढळून येत असून लहान मुलांमध्येही कोव्हीडचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यादृष्टीने कोव्हीडकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून कोव्हीड अजून संपलेला नाही हे लक्षात घेऊन कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत असे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडबाबतच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी दिले.
राज्यभरात वाढत असलेल्या कोरोना बाधीतांच्या संख्येच्या अनुषंगाने आयुक्तांनी सर्व नोडल अधिकारी, विभाग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन त्यांना कोरोना विषयीची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
यामध्ये प्रामुख्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींचा शोध घेण्याचे निश्चित केलेले प्रमाण कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. नागरी आरोग्य केंद्रनिहाय केलेल्या त्यांच्या विभागातील खाजगी डॉक्टरांचे व्हॉट्सॲप ग्रुप पुन्हा अधिक तिव्रतेने कार्यान्वित करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच दैनंदिन कोव्हीड चाचण्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर द्यावा असे त्यांनी सूचित केले. कन्टेनमेंट झोनमधील प्रतिबंधात्मक बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात आले.
प्रामुख्याने लग्न आदी समारंभ साजरे होणारे हॉल तसेच बेन्क्वेट हॉल अशा ठिकाणी नियमानुसार उपस्थित व्यक्ती संख्येचे बंधन राखणे तसेच त्याठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन काटेकोरपणे केले जाईल याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित विभाग अधिकारी यांना देण्यात आले. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याची तसेच यामध्ये हॉलच्या व्यवस्थापनाचीही जबाबदारी असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याची तसेच प्रसंगी त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सध्या कोव्हीड 19 लसीकरण सुरु झाले असल्यामुळे बहुतांशी नागरिक आता प्रतिबंधात्मक लस आली असा विचार करून मास्क न घालता वावरत आहेत व कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करताना दिसत असल्याचे सांगत असा निष्काळजीपणा करणा-या नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले. याकरिता पोलीस कर्मचा-यांसह विभागवार नेमलेल्या दक्षता पथकांची कारवाई अधिक प्रभावीपणे सुरु कऱण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डिसेंबर महिन्यापासून कमी होत चाललेले कोरोना बाधीतांचे प्रमाण मागील आठवड्याभरापासून काहीसे वाढताना दिसत असून आगामी संभाव्य धोका लक्षात घेऊन ही वेळ अधिक सतर्क रहाण्याची आहे. कोव्हीड लसीकरण सुरु झाले असले तरी संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण पूर्ण होत नाही तसेच कोरोना बाधीतांचा आकडा शून्यावर येत नाही तोपर्यंत मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून प्रत्येक नागरिकाने कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून कोरोना विषाणूला आपल्यापासून व आपल्या संपर्कातील व्यक्तींपासून दूर ठेवावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 17-02-2021 15:00:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update