*कोव्हीड नियंत्रणासाठी विभागनिहाय समन्वय अधिकारी नियुक्ती*
10 मार्चपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन ब्रेक द चेनच्या प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेली कोव्हीड उपचार केंद्रे पुन्हा सुरु करण्याबाबत तत्पर कार्यवाही करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजना कालबध्द रितीने सुलभ व गतीमानतेने पार पाडण्यासाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या आठही विभागांसाठी विभाग प्रमुख दर्जाचे "समन्वय अधिकारी" नियुक्त केले आहेत.
यामध्ये बेलापूर विभागाकरिता सहाय्यक संचालक नगररचना श्री. हेमंत ठाकूर, नेरुळ विभागाकरिता उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. मनोज महाले, वाशी विभागाकरिता घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. बाबासाहेब राजळे, तुर्भे विभागाकरिता वाहन विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, कोपरखैरणे विभागाकरिता नगररचनाकार श्री. केशव शिंदे, घणसोली विभागाकरिता परवाना विभागाचे उपआयुक्त श्री. श्रीराम पवार, ऐरोली व दिघा विभागाकरिता मालमत्ता विभागाचे उपआयुक्त श्री. राजेश कानडे तसेच इंडिया बुल पनवेल येथील कोव्हीड केअर सेंटरकरीता मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
या समन्वय अधिका-यांनी आपल्या विभागातील कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड केअर हेल्थ सेंटर व कोव्हीड केअर हॉस्पिटल या संदर्भातील अडीअडचणी उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधीतांशी समन्वय राखायचा आहे. त्याचप्रमाणे कोव्हीड 19 बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तीशोध संदर्भात करावयाच्या कामकाजाबाबतही समन्वय ठेवायचा आहे. तसेच आपल्या विभागातील कंन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीबाबत संबंधीत महापालिका अधिकारी व पोलीस यांच्याशी समन्वयाची भूमिका बजावयाची आहे. त्यासोबतच आपल्या विभागातील नागरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालये, ए.पी.एम.सी., रेल्वे स्टेशन, मोबाईल टेस्टींग कॅम्प याठिकाणी होणा-या आरटी-पीसीआर / रॅपीड अँटीजन टेस्ट या चाचण्यांबाबत नियोजन व नियंत्रणाची भूमिका पार पाडावयाची आहे. याशिवाय आपल्या विभागात कार्यान्वित असलेल्या सर्व कोव्हीड 19 लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी होणा-या लसीकरणाचा दैनंदिन आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण होणेबाबत नियोजन करून कार्यवाही करावयाची आहे.
याव्दारे कोव्हीड 19 च्या उपाययोजनांवर समन्वय अधिकारी यांचे प्रभावी नियंत्रण राहून त्यांची अंमलबजावणी अधिक सुनियोजित रित्या करणे शक्य होणार आहे.
Published on : 30-03-2021 14:22:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update