*नवतंत्रज्ञान विकासासाठी तरूणाईने पुढे यावे - अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर*
देशाच्या आजवरच्या प्रगतीत विज्ञानाची मोठी साथ लाभलेली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने भरीव योगदान दिले आहे. सध्या ज्ञानयुगात वावरत असताना संशोधनाचे रुपांतर तंत्रज्ञानात करून ही प्रक्रिया गतीमान करण्याची गरज व्यक्त करीत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काको़डकर यांनी सतत विकसित होत जाणा-या विज्ञान – तंत्रज्ञानाची बदलती पावले ओळखून जीवनात समस्या आल्या तरी खचून न जाता, जिथे समस्या आहे तिथे संधी आहे हे ओळखून समस्यांवर मात करीत संधीचे सोने करा अशा शब्दात नव्या पिढीला संदेश दिला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘21 व्या शतकातील विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र’ या सुसंवाद कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काको़डकर यांनी श्रोत्यांशी थेट सुसंवाद साधला. दै. लोकमतचे सेंट्रल डेस्क संपादक श्री. विनायक पात्रुडकर यांनी सुसंवादक म्हणून विचारलेल्या विविध प्रश्नांना माहितीपूर्ण उत्तरे देत डॉ. अनिल काको़डकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमार्फत विचारण्यात आलेल्या कुतुहलांनाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे देत श्रोत्यांच्या ज्ञानात भर घातली.
कोणतीही ऊर्जा चांगली किंवा वाईट नसते. तिचा उपयोग आपण कशा पध्दतीने करणार आहोत ही मानसिकता महत्वाची असल्याचे सांगत डॉ. अनिल काको़डकर यांनी ऊर्जेची उपलब्धतता व देशाचा विकास याचा परस्पर संबंध विषद केला. ऊर्जेची उपलब्धतता वाढविण्याचे व त्याचबरोबर कार्बऩ डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगत याबाबत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विकसित होत असून इतर देशात तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जातो व त्यानंतर त्याच्या खर्चाचा आवाका लक्षात घेतला जातो. मात्र आपल्याकडे भविष्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याआधी त्याच्या खर्चाकडे लक्ष दिले जाते. ही प्रयोगशीलतेला मारक बाब टाळून धोका पत्करण्याची मानसिकता निर्माण कऱण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. नव तंत्रज्ञान निर्मितीसाठी आवश्यक बौध्दिक क्षमता आणि कल्पकता आपल्या तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर असून अशा नव्या संकल्पकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याते ते म्हणाले.
आधुनिक काळाचा विचार करता शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे असे सांगत सध्या विविध ज्ञानशाखांच्या सीमा धूसर होत चालल्या असून विद्यार्थ्यांची आपल्या शैक्षणिक वाटचालीत विविध टप्प्यांवर ध्येये बदलू शकतात. त्यानुसार शिक्षण पध्दतीत वाव असला पाहिजे असे सांगत नवे शैक्षणिक धोरण त्यादृष्टीने उपयोगी असून ते चांगल्या पध्दतीने राबविले गेले पाहिजे असे ते म्हणाले. पूर्वीप्रमाणे नोकरी मिळाली की झाले असे दिवस आता राहिले नसून सतत अद्ययावत राहण्याची गरज विषद करीत डॉ. अनिल काको़डकर यांनी विद्यार्थी ज्या परिसरामध्ये राहतो तेथील समस्यांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात उपक्रमशीलता विकसित करणारे शिक्षण द्यायला हवे असा वेगळा विचार मांडला.
अंगणवाडी, शाळा, कॉलेज, व्यवसाय या परिसरातील सर्व गोष्टींचा परस्परांशी असलेला संबंध लक्षात घेऊन त्या संस्था एकत्र आल्या पाहिजेत असे सांगत त्यांनी सिटी आणि व्हिलेज हे दोन शब्द एकत्र करून सुरु केलेली ‘सिलेज’ ही अभिनव संकल्पना विषद केली. समाजातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व स्तरांतील व्यक्तींचे एकमेकांशी उत्तम संबंध असायला हवेत तसेच भिन्न आर्थिक स्तर, ग्रामीण व शहरी अशा विभिन्न स्तरांमध्येही निकोप व घट्ट परस्पर संबंध असण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अशा इको सिस्टीममध्ये कोणताही प्रश्न समोर आला तर त्याचे समाधान करण्यासाठी परस्परांक़डून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते. त्यामुळे उत्तम जीवनमानाच्या दृष्टीने शिक्षण व इको सिस्टीम सुसंगत ठेवण्यासाठी ‘सिलेज’ ही संकल्पना लाभदायी ठरेल असा विश्वास डॉ. अनिल काको़डकर यांनी व्यक्त केला.
यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सोप्या पध्दतीने सौर ऊर्जेचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होतो इथपासून मानवाची उत्क्रांती ते बिग बॅँग थिअरी ते न्युक्लिअर एनर्जीपर्यंत विविध विषयांवरील शंकांचे विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत उत्तरे देत निरसन केले.
यावेळी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत व्दितीय क्रमांकाचे रौप्यपदक व बाल वैज्ञानिक किताब मिळविणा-या नमुंमपा शाळा क्र. 31, कोपरखैरणेचा विद्यार्थी अथर्व महेंद्र मोरे याचा अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे परीक्षेत मानांकन मिळविणारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांतील विद्यार्थी वैदेही नवले, दिप्ती पाटील, अर्चना यादव, गणेश प्रसाद, नीतू यादव, सुमित चव्हाण, स्वदिप बनसोडे, गायत्री योगी, रितेश वाघमोडे, केदार भोसले या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
यानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पॅसेजमध्ये नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक मॉडेल्सची बारकाईने पाहणी करीत डॉ. अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा झेंडा विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकविणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या महनीय व्यक्तीमत्वाच्या प्रेरक विचारांचा लाभ उपलब्ध करून देणारा अभिनव उपक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त राबविल्याबद्दल भरगच्च भरलेल्या विष्णुदास भावे नाट्यगृहातील विद्यार्थी, शिक्षकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोत्यांनी प्रशंसा केली. सुसंवादाच्या समोरापाप्रसंगी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी संस्कृतीचे प्रतिक असणारा पारंपारिक फेटा बांधून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचा सन्मान करण्यात आला.
Published on : 03-05-2022 14:08:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update