‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांचा उत्साही प्रतिसाद आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी यात्रा उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे केले आवाहन
![WhatsApp Image 2024-01-05 at 3_08_08 PM.jpeg WhatsApp Image 2024-01-05 at 3_08_08 PM.jpeg](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/01/mediafiles/WhatsApp_Image_2024-01-05_at_3_08_08_PM.jpeg)
![WhatsApp Image 2024-01-05 at 11_32_28 AM.jpeg WhatsApp Image 2024-01-05 at 11_32_28 AM.jpeg](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/01/mediafiles/WhatsApp_Image_2024-01-05_at_11_32_28_AM.jpeg)
![WhatsApp Image 2024-01-05 at 11_32_43 AM.jpeg WhatsApp Image 2024-01-05 at 11_32_43 AM.jpeg](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/01/mediafiles/WhatsApp_Image_2024-01-05_at_11_32_43_AM.jpeg)
![WhatsApp Image 2024-01-05 at 11_32_38 AM.jpeg WhatsApp Image 2024-01-05 at 11_32_38 AM.jpeg](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/01/mediafiles/WhatsApp_Image_2024-01-05_at_11_32_38_AM.jpeg)
सरकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांना मिळावा यादृष्टीने भारताचे पंतप्रधान ना.श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ देशभरात आयोजित करण्यात आली असून यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहन बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
तुर्भे रेल्वे स्टेशननजिक मोकळ्या पटांगणात आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाप्रसंगी आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. याठिकाणी माजी आमदार श्री. संदीप नाईक यांनीही भेट देत विविध योजनांच्या स्टॉल्सची पाहणी केली व उपस्थित नागरिकांनीही आपल्याशी परिचित नागरिकांपर्यंत या यात्रेची माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, माजी नगरसेवक श्री. सुरेश कुलकर्णी, राजेश शिंदे तसेच राजेंद्र इंगळे व इतर लोकप्रतिनिधी आणि उपआयुक्त डॉ. राहुल गेठे व श्री. सोमनाथ पोटरे, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे, सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये केंद्र व राज्य शासन तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे व योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरण्यापासून संपूर्ण सहकार्य करणारे विविध स्टॉल्स प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी अशा विविध योजनांच्या स्टॉलचा समावेश आहे.
या यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या वतीने योजनांच्या माहिती प्रसारणासाठी एलईडी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर पंतप्रधान महोदयांचा संदेश प्रसारित केला जात आहे तसेच विविध योजनांच्या स्टॉल्सवरून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.
27 डिसेंबर रोजी दिघा येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ झाला असून दररोज सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 अशा दोन सत्रात दररोज दोन ठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या यात्रा उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
कोपरखैरणे विभागात 2 जानेवारीला सकाळच्या सत्रात गुलाबसन्स डेअरी येथे 652 तसेच दुपारच्या सत्रात डी मार्ट येथे 405 नागरिकांनी यात्रा उपक्रमात सहभागी होऊन योजनांची माहिती व लाभ घेतला. 3 जानेवारी रोजी पावणेगाव नाका येथील सकाळच्या सत्रात 551 तसेच एमजेपी महापे येथे दुपारच्या सत्रात 361 नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. 4 जानेवारीला सकाळच्या सत्रात रेल्वे स्थानक कोपरखैरणे येथे 323 नागरिक यात्रा उपक्रमात सहभागी झाले व 4 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात परिमंडळ 2 क्षेत्रातून या यात्रेने परिमंडळ 1 विभागात प्रवेश केला. यावेळी आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत 758 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत हा उपक्रम यशस्वी केला.
18 जानेवारी पर्यंत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे 23 दिवसांत 45 ठिकाणी विभागवार नियोजन केलेले असून यात्रेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रचार केला जात आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी जनता मार्केट तुर्भे व दुपारी सिताराम मास्तर उदयान से. 8 सानपाडा येथे यात्रा आयोजित करण्यात आली असून 6 जानेवारी रोजी सकाळी तुर्भे नाका व दुपारी तुर्भे गाव तलाव तसेच 7 जानेवारी रोजी सकाळी माथाडी भवन एपीएमसी मार्केट व दुपारी से. 9 मार्केट वाशी येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे. 8 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात वाशी रेल्वे स्थानक आणि दुपारच्या सत्रात ब्ल्यू डायमंड चौक वाशी या ठिकाणी यात्रा उपक्रमाचे नियोजन आहे.
पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आरंभापासूनच दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे अशा परिमंडळ-2 क्षेत्रातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून 4 जानेवारीला दुपारच्या सत्रात यात्रेचा परिमंडळ-1 विभागात प्रवेश झाल्यानंतरही वाढता प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. यात्रेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. तरी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी यात्रा उपक्रमामध्ये सहभागी होऊन या योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ करुन घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 30-01-2024 08:20:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update