'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा दिघा येथे नागरिकांच्या उत्साही उपस्थितीत प्रारंभ
![01_IMG_0610.JPG 01_IMG_0610.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/03/mediafiles/01_IMG_0610.JPG)
![02_IMG_0562.JPG 02_IMG_0562.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/03/mediafiles/02_IMG_0562.JPG)
![03_IMG_0637.JPG 03_IMG_0637.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/03/mediafiles/03_IMG_0637.JPG)
![04_IMG_0653.JPG 04_IMG_0653.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/03/mediafiles/04_IMG_0653.JPG)
![05_IMG_0667.JPG 05_IMG_0667.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2024/03/mediafiles/05_IMG_0667.JPG)
'योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना थेट लोकांपर्यंत पोहोचून त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना गतीमानतेने देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस व ना.श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शुभारंभ दिघा तलावानजीकच्या पटांगणात नागरिकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'शासन आपल्या दारी' अभियानाचे अतिशय उत्तम नियोजन 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत 28 ठिकाणी करण्यात आले असून दिघा ते बेलापूर या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज सकाळ व दुपार अशा दोन सत्रात हा उपक्रम संपन्न होणार आहे.
'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या दिघा येथील शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांनी शासकीय कार्यालयात जाऊन योजनांचा लाभ घेण्यात नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व नागरिकांना अगदी त्यांच्या घराजवळ योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. आपल्या दारापर्यंत लोककल्याणकारी योजना घेऊन येणारा हा उपक्रम अत्यंत लाभदायी असल्याचे सांगत त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार म्हसाळ यांच्या समवेत समाजविकास विभागाचे उपायुक्त श्री. किसनराव पलांडे, परिमंडळ 2 चे उपायुक्त डॉ.श्रीराम पवार, मुख्यमंत्री जनकल्याण योजनेचे शासकीय अधिकारी श्री सुनील आव्हाड,दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अशोक अहिरे, समाजविकास अधिकारी श्री.सर्जेराव परांडे तसेच माजी नगरसेवक श्री. नवीन गवते, ॲड. अपर्णा गवते, श्रीम. दिपा गवते आणि श्री. वीरेंद्र सिंग व श्री सुरेश पाल आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना समाजविकास विभागाचे उपायुक्त तथा 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे नमुंमपा नोडल अधिकारी श्री. किसनराव पलांडे यांनी लोककल्याणकारी योजना प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावी व त्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी लोकाभिमुख महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले 'शासन आपल्या दारी' हे अभियान नवी मुंबईतील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. एका छताखाली शासनाच्या विविध योजना व त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या पन्नासहून अधिक कल्याणकारी योजना यांचा लाभ शेवटच्या घटकाला करून देणारा हा उपक्रम अत्यंत लाभदायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. नवीन गवते यांनी आम्हां लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवण्यामध्ये व जास्तीत जास्त लाभार्थी नागरिक या योजनांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी होईल असे सांगितले.
शासनाच्या योजनांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोककल्याणकारी योजनांचेही माहितीप्रद स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले असून त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात 300 हून अधिक तसेच दुपारच्या सत्रात 550 हून अधिक नागरिकांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घेतला. काहीजणांनी शासनाच्या व महानगरपालिकेच्या योजनांची माहिती करून घेतली तसेच अनेक जणांनी योजनांचे अर्ज भरून योजनांचा लाभही घेतला.
दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण केली आणि आभार प्रदर्शन केले.
यापुढील 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम ऐरोली विभागात 23 जानेवारी रोजी, सकाळी 11 ते 1 या वेळेत ऐरोली विभाग कार्यालय तसेच दुपारी 2 ते 5 या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक 53, चिंचपाडा, ऐरोली या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे 24 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक 48, दिवा, ऐरोली (काचेची शाळा) येथे त्याचप्रमाणे दुपारी 2 ते 5 या वेळेत सेक्टर 15, ऐरोली येथे आर. आर. पाटील मैदान येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे. तरी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 14-03-2024 13:05:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update