अनंतचतुर्दशीदिनी 4336 श्रीगणेशमूर्तींना "गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात भावपूर्ण निरोप 54 टक्के नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनास पसंती देत घडविले पर्यावरणशीलतेचे दर्शन
यावर्षी कोव्हीड 19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशोत्सव सर्व नागरिकांच्या जागरूक सहकार्यातून आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नियमांच्या चौकटीत संपन्न झाला. भाविकांनी अत्यंत आत्मियतेने, 'संपूर्ण विश्वावरील हे कोरोनाचे संकट दूर करा' अशी मागणी करीत, आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये 'पुढल्या वर्षी लवकर या' अशी श्रीगणरायाकडे प्रार्थना केली आणि विसर्जनाच्या इतर 4 दिवसांप्रमाणेच अनंतचतुर्दशीदिनीही भक्तीमय अंत:करणाने श्रीगणेशाला निरोप दिला.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकुण 4304 घरगुती व 32 सार्वजनिक अशा एकूण 4336 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यामध्ये पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवर 2140 घरगुती तसेच 18 सार्वजनिक अशा 2158 श्रीमूर्तींचे तसेच कोव्हीड 19 चा पार्श्वभूमीवर यावर्षी मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या 135 कृत्रिम विसर्जन तलावांना प्राधान्याने पसंती देत 2164 घरगुती व 14 सार्वजनिक अशा 2178 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पारंपारिक मुख्य 22 विसर्जन स्थळांवर -
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 497 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 563 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 248 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 294 घरगुती व 04 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 65 घरगुती, 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 266 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 207 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
अशा रितीने एकूण 21 विसर्जन स्थळांवर 2140 घरगुती व 18 सार्वजनिक अशा एकूण 2158 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
तसेच कोव्हीड 19 चा प्रसार प्रतिबंधासाठी गर्दी टाळणे तसेच सोशल डिस्टन्सींग राखले जाणे यादृष्टीने प्रथमत:च इतक्या मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर,
बेलापूर विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 120 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 213 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 146 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 210 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 14 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 544 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात - 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 400 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 22 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 311 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 7 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 220 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती
अशाप्रकारे एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2164 घरगुती व 14 सार्वजनिक अशा एकूण 2178 श्रीगणेशमुर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.
विसर्जनस्थळांवर नियोजनबध्द व्यवस्था
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त श्री. संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त श्री. पंकज डहाणे व वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. सुनील लोखंडे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.
महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मुख्य विसर्जनस्थळांवर व्यासपीठ उभारण्यात आले होते. तेथे ध्वनीक्षेपकाव्दारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्यात येत होत्या. त्याठिकाणी श्रीगणेशमुर्ती विसर्जनाकरीता तराफ्यांची व फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग करण्यात आले होते. तसेच विद्युत व्यवस्थेसह अत्यावश्यक प्रसंगी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.
पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व विसर्जनस्थळांवर 1 हजारहून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् दक्षतेने तैनात होते. शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य केले.
नागरिकांची कृत्रिम विसर्जन तलावांच्या नवी मुंबई पॅटर्नला प्राधान्याने पसंती
अशाच प्रकारची सुयोग्य व्यवस्था 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवरही करण्यात आली होती. नागरिकांनी यावर्षी प्रथमत:च निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करण्यास प्राधान्याने पसंती दिली.. दीड, पाच, गौरीसह सहा, सात आणि अनंतचतुर्दशी दिन अशा पाच विसर्जन दिवसांमध्ये एकूण 23912 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 12860 श्रीमूर्ती या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. म्हणजेच साधारणत: 54 टक्के नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करून स्वयंशिस्तीचे व पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले.दिघा विभागात पारंपारिक विसर्जन स्थळावर एकही मूर्ती विसर्जन न करता भाविकांनी कृत्रिम विसर्जन स्थळांवरच श्रीमूर्तींचे विसर्जन केले.
कन्टेंटमेंट झोनमध्ये श्रीमूर्ती संकलनासाठी फिरत असलेल्या विशेष वाहनांनाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी मंगलमय वातावरणात घरीच श्रध्दापूर्वक श्रीमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जन स्थळांवर आलेले बहुतांशी नागरिक श्रींची निरोपाची आरती घरीच करून मर्यादित व्यक्तींसह विसर्जनस्थळी आल्याचे चित्र पहावयास मिळाले. कोणत्याही वाद्यांच्या गजबजाटाशिवाय अत्यंत शांततेने हा विसर्जन सोहळा मनोभावे पार पडला.
25 टन 785 किलो निर्माल्यातून होणार नैसर्गिक खतनिर्मिती
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक घ्यावयाची काळजी तसेच 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' च्या अनुषंगाने स्वच्छतेविषयी आवाहन करणारे होर्डींग विसर्जनस्थळी प्रदर्शित करण्यात येऊन शहर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
सर्व विसर्जनस्थळी ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते व हे निर्माल्य वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे सर्व विसर्जन स्थळांना भेटी देत स्वच्छताविषयक पाहणी करीत होते. अनंतचतुर्दशीदिनी 5 टन 25 किलो निर्माल्य जमा झाले असून दीड दिवसापासून अनंतचतुर्दशीच्या विसर्जनापर्यंत एकूण 25 टन 785 किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्र खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.
कोव्हीड 19 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत मंगलमूर्ती गणरायाचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी मौलिक सहकार्य केले. विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व विभागांमध्ये नागरिकांच्या घराजवळ सोयीच्या ठिकाणी 135 इतक्या मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांना नागरिकांनी पसंती दर्शविल्याने गर्दी विभागली जाऊन कोव्हीड 19 विषयक नियमांचे पालन झाले, पर्यावरण संरक्षण झाले तसेच व्यवस्थेवरील ताण कमी झाला. सर्वांच्या सहकार्यामुळेच महापालिका क्षेत्रातील विसर्जनसोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला याबद्दस महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
Published on : 02-09-2020 12:36:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update