शाळा, महाविद्यालय मुख्याध्यापकांशी आयुक्त श्री. अण्णसाहेब मिसाळ यांचा स्वच्छतेविषयी सुसंवाद
स्वच्छता ही सर्वांची सामुहीक जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मानांकन उंचाविण्यासाठी लोक सहभागावर विशेष भर देण्यात येत असून त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानात प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग असावा यादृष्टीने विभागीय पातळीवर संवाद सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची विशेष बैठक महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. तुषार पवार, शिक्षणाधिकारी तथा उपायुक्त श्री. नितीन काळे तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित व स्वंयअर्थ संहिता तत्वावर असणाऱ्या 356 शाळा व कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रीनसोल संस्थेमार्फत जुने चप्पल जोड जमा करण्यात येऊन त्यापासून नवीन चप्पल बूट तयार करण्यात येतात याविषयी माहिती देण्यात आली. तसेच नवी मुंबईच्या 28 वर्षांच्या विकास वाटचालीचा मागोवा घेणारा प्रगतीच्या पाऊलखूणा हा माहितीपट दाखविण्यात आला.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका शाळा व खाजगी शाळांनी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान राबविणे, विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकापर्यंत स्वच्छता अभियानाबाबत संदेश पोहचविणे, स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रतिक्रिया (फीड बॅक) देणे, शाळा व महाविद्यालयामध्ये दर्शनी भागी स्वच्छता विषयक सुविचार प्रदर्शित करणे या विषयी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 4 जानेवारी रोजी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दोन गटात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून त्यामध्ये आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत असे आवाहन करण्यात आले.
स्वच्छ नवी मुंबई राखणे ही फक्त महापालिकेची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे. या अभियानात कर्तव्य भावनेने सर्वांनी मोठया संख्येने सहभागी होण्याची आवश्यकता आहे. शाळा, शाळेचा परिसर, स्वच्छता गृह याची स्वच्छता रोजच्या रोज करणे, शाळेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शाळा स्तरावर कंपोस्ट खत प्रकल्प सुरु करणे, याकरिता शाळा व्यवस्थापनांनी पुढाकाऱ घ्यावा असेही आवाहन करत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी उपस्थितांना सामुहीक ‘‘स्वच्छता शपथ’’ दिली.
Published on : 03-01-2020 13:13:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update