चित्ररूप भिंतीतून नवी मुंबई आकर्षक रंगांनी सजली
स्वच्छता ही नागरिकांची नियमित सवय व्हावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेचा संदेश नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जात आहे. यापैकीच एक प्रभावी दृष्य माध्यम म्हणून शहरातील मुख्य भिंतींना विविध आकर्षक रंगांनी व चित्रांनी सजवून 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' च्या अनुषंगाने स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला जात आहे.
यामध्ये विविध संकल्पनांचा उपयोग केला जात असून नवी मुंबई शहर वसविण्यापूर्वी येथील मूळ आगरी कोळी संस्कृती ते सुनियोजित नगरी व आगामी विमानतळापर्यंतचा प्रवास मुख्य रस्त्यांशेजारील भिंतींवर चित्रांच्या माध्यमातून रेखाटला आहे. याशिवाय आकर्षक देखावे, मुलांचे आवडते कार्टुन हिरोज् अशा विविध माध्यमातून दिघा ते बेलापूर अशा सर्वच विभागात नागरिकांचे येता जाता लक्ष वेधून घेईल आणि स्वच्छतेची जाणीव निर्माण करेल अशाप्रकारे भिंतीचित्रे चितारली आहेत. यापैकी सजविलेल्या अनेक भिंतींचा नागरिकांकडून हौसेने सेल्फी पॉईंट म्हणून वापर केला जात आहे.
नुकत्याच नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या स्वच्छता विषयक 'स्वच्छ सर्वेक्षण 2020 चित्रकला स्पर्धे'त 18 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छतेविषयीच्या आपल्या मनातील संकल्पनांना चित्ररूप दिले. त्याचप्रमाणे जनमानसावर प्रभाव टाकणा-या लघुपटासारख्या लोकप्रिय माध्यमाचाही उपयोग केला जात असून लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2019' मध्ये नवी मुंबई हे 'नागरिकांचा प्रतिसाद' क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहराचे मानकरी ठरले होते. उत्साही नवी मुंबईकर नागरिकांचा स्वच्छता कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. हा सहभाग अधिक वाढावा याकरीता ठिकठिकाणी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई शहरभर स्वच्छतेचा संदेश देणा-या चित्ररुप बोलक्या भिंती रेखाटण्यातही त्या त्या विभागातील शाळा महाविद्यालयांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' ला सामोरे जाताना नवी मुंबईचे रुप अधिक आकर्षक व लक्षवेधी ठरत आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी नवी मुंबई अधिक स्वच्छ व सुंदर दिसत असल्याचा अभिप्राय नागरिकांकडून व्यक्त केला जात असून यावर्षी कचरामुक्त शहरात 5 स्टार रेटींग प्राप्त केल्यामुळे व 5 स्टार रेटींग प्राप्त करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर असल्याने तसेच हागणदारीमुक्त शहराचे ओडीएफ डबल प्लस रेटींग नवी मुंबई महानगरपालिकेने कायम राखल्याने नागरिकांचा उत्साहात वाढ झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेत राज्यात नेहमीच प्रथम क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई शहराला देशात नंबर वन करण्यासाठी नवी मुंबईकर नागरिक सज्ज व सक्रीय झाले असल्याचा विश्वास महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 06-01-2020 14:34:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update