जागतिक पाणथळ दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम संपन्न
नवी मुंबई हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे व देशातील सातव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मागील वर्षी नावाजले गेले असून या वर्षी देशात प्रथम क्रमांकाच्या मानांकनासाठी सज्ज आहे. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त शहर निर्मितीकरीता नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवित असून स्वच्छता ही नागरिकांची सवय होण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात करत प्रथमत: महानगरपालिकेचे मुख्यालय सिंगल युज प्लास्टिक फ्री करण्यात आले आहे. प्लास्टिक प्रतिबंधाच्या दृष्टीने टेरी आणि यु.एन.ई.पी. यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असून शहरातील नागरिक व त्यातही विशेषत्वाने तरुणाईने यात सक्रीय सहभाग घेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पुढे आली आहे हे चित्र आश्वासक असल्याचे मत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. जे.एस.सहारिया, टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार माजी सनदी अधिकारी श्री. जी.एस.गील, भारत सरकारचे उच्च अधिकारी श्री. लोविश अहूजा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण तदर्थ समिती सभापती श्रीम. दिव्या गायकवाड, उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, टेरी संस्थेच्या सह संचालक डॉ. अंजली पारसनीस, यू.एन.ई.पी.च्या प्लास्टिक प्रदुषण सल्लागार श्रीम. सलोनी गोयल व इतर मान्यवर उपस्थित होते.
टेरी (TERI) व युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेन्ट (UNEP) आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने सागर विहार से.8, वाशी येथे 'जागतिक पाणथळ दिवसा'चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये टेरी संस्थेच्या संकल्पनेतून विद्यार्थी स्वयंसेवक यांनी तयार केलेल्या वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले. “प्लास्टिकविषयी पुनर्विचार (Rethink Plastic)" या संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक कच-यापासून तयार करण्यात आलेल्या कोलाज चित्राचे अनावरण आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव श्री. जे.एस.सहारिया यांनी रिथींक प्लास्टिक या उपक्रमाचे कौतुक करून यामधील युवकांचा सहभाग लक्षणीय असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्लास्टिक प्रदुषणाविरुध्द वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर भरीव काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार निवृत्त सनदी अधिकारी श्री. जी.एस.गील यांनी नवी मुंबई शहर इको सिटी बनण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने टेरी संस्था सहयोगाने काम करीत असल्याचे सांगितले. प्लास्टिक प्रतिबंधाबाबत एक अभिनव प्रकल्प राबविण्याबाबतही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
रिथींक प्लास्टिक संकल्पनेबद्दल बोलताना टेरी संस्थेच्या सह संचालक डॉ. अंजली पारसनिस यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये पिंपळ, उंबर, वड अशा देशी वृक्षांची रोपे तयार करुन त्यांचे संवर्धन करण्यातून प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्उपयोग तसेच पर्यावरण संरक्षण हे विविध हेतू साध्य होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी खारफुटीचे महत्वाही विषद केले. यावेळी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांनी 100 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक संकलित केले व नवी मुंबई महानगरपालिकेकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रदान केले.
यावेळी यू.एन.ई.पी. संस्थेच्या प्रदुषण सल्लागार श्रीम. सलोनी गोयल यांनी समुद्रामध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक कचऱ्यामुळे त्याचा सर्व जीवसृष्टीवर परिणाम होत असल्याचे आढळून येत असल्याने पाणी, हवा व जीवसृष्टीवरील प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम लक्षात घेऊन ते थांबविण्यासाठी विशेषत्वाने समुद्री प्लास्टिक प्रदुषणावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असल्याची माहिती दिली. याकरिता मुंबई, आग्रा, अहलाबाद, हरिव्दार याठिकाणी उपक्रम सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व आय.सी.एल. महाविद्यालय, नेरुळचे रामराव आदिक तंत्र महाविद्यालय व एस.आय.ई.एस. महाविद्यालय तसेच इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ एनव्हारमेंट मॅनेजमेंट तसेच एन.एस.एस.चे विद्यार्थी "समुद्री प्लास्टिकपासून पानथळ जागांचा बचाव" या संकल्पनेस अनुसरून खारफुटी क्षेत्रातील प्लास्टिक संकलन मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Published on : 03-02-2020 13:19:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update