वृक्ष रक्षण आणि संवर्धनाकडे नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे विशेष लक्ष
सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर याप्रमाणेच इको सिटी ही नवी मुंबईची आणखी एक विशेष ओळख असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकरण ही ओळख दृढ करण्यासाठी सजगतेने कार्यरत आहे. या अनुषंगाने आजच्या वृक्ष प्राधिकरण सभेत नवी मुंबई क्षेत्रातील धोकादायक वृक्ष व विकासकामातील वृक्ष तोडणे यासाठी एकूण 66 प्रस्ताव विभाग स्तरावरुन प्राप्त झाले होते. सदर प्रस्तावांवर वृक्ष प्राधिकरण सदस्यांसोबत प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सविस्तर चर्चा केली आणि मानवी जीवनात वृक्षांचे महत्वाचे स्थान असून शहराचे पर्यावरण चांगले रहावे यासाठी विकास कामांच्या नावखाली झाडे तोडण्यास सरसकट परवानगी देणे योग्य होणार नाही याबाबत विशेष मत नोंदविले. चर्चेअंती आयुक्तांनी या प्रस्तावांपैकी जास्तीत जास्त झाडे वाचवता येतील काय व त्यांचे स्थलांतर करणे शक्य आहे काय, याबाबत पाहणी करुन निर्णय घेण्यात येईल असे निर्देश दिले.
वृक्ष प्राधिकरणास प्राप्त प्रस्तावांमध्ये गृहनिर्माण संकुल व रो हाऊसेस यांच्या परिसरातील वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले असून यापैकी बरीचशी झाडे संरक्षक भिंती व इमारतीला धोका असल्याकारणाने तोडण्यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे. संरक्षक भिंतीस धोका निर्माण झाल्याने झाड तोडणे योग्य होणार नाही. त्यासाठी कुंपण भिंत नव्याने बांधून झाड वाचवावे असा पर्याय देण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील नागरिक व सोसायटी यांनी वृक्षांची लागवड ही गटारे, पाण्याची टाकी, संरक्षण भिंती लगत, मलनि:स्सारण वाहिनी शेजारी, उच्च दाबाच्या वाहिनीखाली करू नये, जेणेकरून भविष्यात या झाडांमुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असेही आवाहन महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 13-03-2020 15:17:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update