कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थितीवर नियंत्रण
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगभरातील विविध देशात आऱोग्यविषयक समस्या निर्माण झाली असून भारतातही केंद्र व राज्य सरकारमार्फत आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने तसेच कोरोना विषाणूचा प्रसार शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये व राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये याकरिता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत शासन आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील तातडीचे व महत्वाचे कामकाज सुरु रहावे व अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याचीही जपणूक व्हावी या दृष्टीने शासन निर्णयाच्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यालयातील विविध विभागांच्या विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलवता आळीपाळीने (रोटेशन) कार्यालयात बोलवावे असे आदेश जारी केले आहेत.
सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमधील अनावश्यक गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने कार्यालयात उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेमध्ये लवचिकतेची सवलत देणेबाबतसुध्दा विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांनी अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची गरज बघून त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे. तथापी अशाप्रकारे कार्यवाही करताना कार्यालयातील एकूण अधिकारी, कर्मचारी यांची संख्या पन्नास टक्के राहील याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल, त्यांनी त्यांची प्रलंबित राहिलेली कामे कार्यालयातील उपस्थितीच्या दिवशी पूर्ण करावीत हे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. आपल्या अधिनस्त कोणत्या अधिकारी, कर्मचारी यांना सवलत द्यावी याबाबतचे अधिकार संबंधित विभागप्रमुख यांना असणार आहेत व त्यांच्या उपस्थितीबाबत उचित नोंद घेण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांची असणार आहे.
जे अधिकारी, कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊन इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करावी तसेच वैद्यकिय प्रमाणपत्र सादर न करता परिवर्तीत रजा सुध्दा संबंधितांना मंजूर करण्यास हरकत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी संबंधित विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांचेकडे उपलब्ध करून द्यावा व ते संपर्क पत्त्यावर ते उपलब्ध राहतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यानुसार त्यांनी त्वरीत कार्यालयामध्ये उपस्थित राहणे बंधनकारक राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
क्षेत्रीय स्तरावर ज्या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते अशा कार्यालयांना तसेच आपत्कालीन / अत्यावश्यक सेवा देणा-या कार्यालयांना हे आदेश लागू असणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहे. सदरचे आदेश 31 मार्च 2020 पर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून लागू राहतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सामाजिक आरोग्य हिताच्या दृष्टीने महानगरपालिकेशी संबंधित आपली कामे शक्यतो ऑनलाईन प्रणालीचा वापर करून करावीत असे नागरिकांना आवाहन करतानाच नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयांमध्ये अभ्यागतांना अत्यावश्यक कामाशिवाय तात्पुरती प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यासही नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 20-03-2020 13:06:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update