कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने महापौर श्री. जयवंत सुतार यांनी घेतली केली परिस्थितीची पाहणी
कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गातून होत असल्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात कोणीही घराबाहेर न पडता घरीच स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी बेलापूर ते दिघा येथील आठही विभाग कार्यालय व नागरी आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये यांना भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची व उपाययोजनांची पाहणी केली.
नवी मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून नवी मुंबईकर नागरिकांविषयीच्या काळजीच्या भावनेने महापौर श्री. जयवंत सुतार यांनी विभागवार परिस्थितीची पाहणी करत नागरिकांना अत्यावश्यक सुविधा वेळच्या वेळी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुयोग्य नियोजन करावे अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे नवी मुंबईकर नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविताना अधिकारी, कर्मचारी वर्गानेही आपल्या प्रकृतीची सुरक्षा साधनांचा वापर करून काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
जागतिक परिस्थिती बघता नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन घरातच थांबावे व जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी थोड्या वेळासाठी बाहेर आले तरी हातरूमाल किंवा मास्कचा वापर करावा व एकमेकांपासून किमान 1 मिटर अंतर ठेवावे आणि लगेच घरी जावे असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार यांनी केले आहे.
Published on : 26-03-2020 15:00:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update