नवी मुंबई महानगरपालिकेचा मानसोपचार समुपदेशन कक्ष वाढवतोय नागरिकांचे मनोबल
कोरोनाचा संसर्ग मला तर होणार नाही ना ? यावर काही उपाय आहे की नाही ? हे सर्व कधी थांबणार ? अजून किती दिवस वाढणार हा लॉकडाऊन ? लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा पूर्ववत स्थिती यायला किती दिवस लागतील ? - या आणि अशा अनेक प्रश्नांचे ठोस उत्तर कुठूनच मिळत नसल्याने लॉकडाऊनमध्ये घराघरात बसलेले नागरिक त्रस्त आहेत. त्यात कोरोनाविषयक वाढती आकडेवारी चिंतेत अधिकच भर घालतेय. अशावेळी गरज आहे ती नागरिकांचे मनोबल कायम राखण्याची, ते उंचावण्याची.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून 'कोव्हीड - 19 मानसोपचार समुपदेशन कक्षा'ची संकल्पना पुढे आली आणि आज ती अत्यंत लाभदायी होत असल्याचे अभिप्राय नागरिकांकडूनच प्राप्त होत आहेत.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने 022-35155012 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला असून कोणत्याही नागरिकाने यावर संपर्क साधल्यास अनुभवसंपन्न तज्ज्ञ क्लिनिकल सायकॉलॉजिस्टशी हा व्हर्च्युअल कॉल जोडला जाऊन नागरिकांचा त्यांच्याशी सहज संवाद साधता येत आहे. सध्या केईएम रूग्णालयाच्या सेवानिवृत्त डीन आणि नामांकीत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर तसेच क्लिनीकल सायकोलॉजिस्ट श्रीम. सलमा प्रभू यांच्या मुख्य समन्वयाखाली 8 तज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट, सायक्रॅटिस्ट नागरिकांशी संवाद साधत आहेत.
ज्याप्रमाणे सर्वसामान्य़ नागरिकांमार्फत हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात आल्यानंतर हे मानसोपचार तज्ज्ञ संवाद साधत आहेत तसेच ज्या व्यक्ती या काळात क्वारंटाईन आहेत अथवा कोरोना पॉझिटिव्ह आहेत अशा व्यक्तींशीही महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून ते संवाद साधत आहेत. त्यांची विचारपूस करीत आहेत. त्यांच्या मनातल्या भावभावना जाणून घेत समुपदेशन करीत त्यांचे मनोबल उंचावत आहेत.
या काळात भवतालच्या परिस्थितीमुळे चिंताग्रस्त स्वभाव असणा-या व्यक्ती साधी शिंक आली किंवा खोकला आला तरी आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना ? अशा विचाराने त्रस्त होत आहेत. अशावेळी त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. त्याचप्रमाणे कोरोनाची लागण झाली म्हणजे आता सगळे काही संपले, असाही विचार कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाच्या मनात उमटू शकतो. अशावेळी कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्याहून अधिक आहे हे त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. हे काम मानसोपचार तज्ज्ञ महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून मनापासून करताहेत.
खरे तर कोरोनातून बाहेर येणे ही अडचण नाही. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून करणे शक्य आहे. खरी अडचण आहे ती हा झपाट्याने पसरणारा संसर्गजन्य आजार असल्याने एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रूग्ण निर्माण झाले तर त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची. याकरिता कोरोना प्रसाराची साखळी खंडीत करणे व रूग्णसंख्या वाढू न देणे हाच महत्वाचा उपाय आहे. आणि त्याकरिता परस्पर संपर्क टाळण्यासाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरातच राहून कोरोनाची साखळी खंडीत करावी असे या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीने पटवून सांगितले जाते. नागरिकांच्या मनातल्या भावनांच्या आंदोलनांना संवादातून मोकळी वाट करून दिली जाते.
या कक्षाच्या समन्वयक नामांकीत क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट श्रीम. सलमा प्रभू यांनी अशाप्रकारे महानगरपालिका आपल्या मानसिकतेचा विचार करतेय हीच अत्यंत वेगळी आणि समाधानाची बाब असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले असल्याचा अनुभव सांगितला. दररोज प्रत्येक क्लिनीकल सायकोलॉजिस्ट / सायक्रॅटिस्ट साधारणत: 15 ते 20 नागरिकांशी संवाद साधत असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांशी बोलताना आम्ही सुरूवातीला त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी, राहणीमानाविषयी, परिस्थितीविषयी, आवडीनिवडींविषयी बोलतो. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलून मग त्यांची त्याबाबतची मते जाणून घेतो. त्यांना त्यांच्या मनातले बोलण्याविषयी प्रोत्साहित करतो आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्याकडूनच या परिस्थितीवर मात करण्यासाठीचे पर्याय जाणून घेऊन त्यावर नियोजन करून कार्यवाही करण्याविषयीचा निश्चय करून घेतो. आमच्याशी संवाद झाल्यानंतर खूप मोकळे व सुरक्षित वाटले अशा प्रतिक्रिया जवळजवळ सर्वच नागरिकांकडून येत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेने लोकांच्या अडचणीच्या काळात हे मानसिक आधार देण्याचे अतिशय महत्वाचे काम करण्याची अनमोल संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीम. सलमा प्रभू यांनी संपूर्ण मानसोपचार तज्ज्ञ समुहाच्या वतीने आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे आभार मानले आहेत.
केईएम रूग्णालयाच्या सेवानिवृत्त डीन आणि नामांकीत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे महत्व ओळखले पाहिजे व ते काटेकोरपणे पाळले पाहिजे असे मत व्यक्त केले. विशेषत्वाने क्वारंटाईन नागरिकांशी संवाद साधताना, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकाशी नजिकचा संपर्क असल्याने आपल्याला क्वारंटाईन व्हावे लागतेय ही भावना त्यांच्या मनात येणे साहजिक आहे, मात्र आपण क्वारंटाईन होऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याचे, म्हणजेच एकप्रकारे सामाजिक आरोग्य जपण्याचे फार मोठे काम करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून देत असल्याचे सांगितले. ही सकारात्मक भावना नागरिकांच्या मनात निर्माण करून नागरिकांनी कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास न लपवता त्वरित नजिकच्या महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क साधला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या डॉ. शुभांगी पारकर दररोज 'महामारीच्या काळातील मानसिक आरोग्य' या विषयावर नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या 'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई' या इंटरनेट रेडिओवरून श्रोत्यांशी विविध विषयांवर संवाद साधणार आहेत व कोरोनाच्या आरोग्य आपत्तीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य कायम राखण्याबाबत महत्वाच्या टिप्स देत आहेत. त्यांच्या व्याख्यानांवर श्रोत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत.
तरी नागरिकांनी आपल्या मनातील कोरोना विषयीच्या शंका तसेच ताण-तणाव दूर करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'कोव्हीड - 19 मानसोपचार समुपदेशन कक्षा'शी 022-35155012 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून महानगरपालिकेचे प्रतिनिधीत्व करणा-या क्लिनीकल सायकोलॉजिस्ट / सायक्रॅटिस्ट यांच्याशी विनामूल्य संपर्क साधावा आणि या काळात आपले शारीरिक स्वास्थ्याप्रमाणेच आपले मानसिक स्वास्थ्यही जपावे असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 27-04-2020 07:28:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update