निसर्ग चक्रीवादळाच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन
भारतीय हवामान खात्याच्या वतीने 31 मे रोजी प्राप्त सूचनेनुसार 2 ते 4 जून पर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसणार असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीने संबंधित विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांची बैठक घेऊन पूर्वतयारीबाबत आढावा घेतला होता व मौल्यवान सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नवी मुंबई पोलीस विभागाच्या सहकार्याने विविध विभागांत विशेषत्वाने खाडीकिनारी असलेल्या भागातील मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याच्या व नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दि. 2 जून रोजी हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार 3 जून रोजी दुपारी 12 च्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ रायगडच्या समुद्र किनारी धडकणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सकाळी 9 ते सायं. 6 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन आणि अग्निशमन विभाग तसेच सर्व विभाग कार्यालये चक्रीवादळाची परिस्थिती हाताळण्यासाठी दक्ष होते.
काल रात्रीपासूनच महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ हे सर्व विभागांमधील स्थितीवर लक्ष ठेवून होते व त्यांचा सातत्याने सर्व संबंधित घटकांशी उपाययोजनांविषयक सतत संवाद सुरु होता. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन यंत्रणा कार्यकृतीसाठी सज्ज होती.
आज सकाळपासूनच हलक्या सरींच्या पावसाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजल्यापासून पावसाचा जोर काहीसा वाढत गेला आणि साधारणत: दुपारी 2 वाजल्यापासून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. हा वा-याचा आणि पावसाचा जोर वाढत जाऊन साधारणत: 4.15 वा. च्या सुमारास वा-याचा वेग कमी होत गेला.
आज 3 जून रोजी दिवसभरात सकाळी 8 वा. पासून 5.30 वा.पर्यंत बेलापूर येथे 48.80 मिमी, नेरूळ येथे 46.00 मिमी, वाशी येथे 30.40 मिमी, कोपरखैरणे येथे 32.00 मिमी आणि ऐरोली येथे 31.44 मिमी अशाप्रकारे एकूण 31.44 मिमी पर्जन्यवृष्टीची नोंद झाली.
जोरदार वा-यामुळे सर्वच विभागांत झाडे व झाड्याच्या मोठ्या फांद्या कोसळण्याच्या 83 घटनांची नोंद झाली. त्याठिकाणी अग्निशमन व उद्यान विभागाच्या वतीने विभाग कार्यालयांच्या सहयोगाने तातडीने फांद्या उचलून मार्ग मोकळा करण्याचे काम काही ठिकाणी जेसीबीचा वापर करून तातडीने सुरू करण्यात आले.
त्याचप्रमाणे विशेषत्वाने खाडीकिनारी असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच डोंगरभागातील झोपडपट्टी भागात काल सायंकाळी व आज सकाळी पोलीस विभागाच्या सहयोगाने नागरिकांनी सतर्क रहावे व महानगरपालिकेने निवारा व्यवस्था केलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने आज बेलापूर विभागातील जय दुर्गामाता नगर, संभाजीनगर, रमाबाई आंबेडकर नगर येथील वस्त्यांमधील 210 नागरिकांना नमुंमपा शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले व त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कोकण भवनच्या बाजूच्या काही झोपड्यांची छप्परे वा-याने उडून गेल्याने तेथील 500 हून अधिक नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले.
त्याचप्रमाणे नेरूळ विभागातील रमेश मेटल क्वारी जवळील 130 नागरिकांना, सानपाडा से.20 येथील 100 हून अधिक नागरिकांना तसेच ऐरोली सेक्टर 10 येथील सर्कसच्या तंबुतील 32 कलाकारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. या सर्वांच्या जेवणाची व निवा-याची सोय करण्यात आली. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन केलेल्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. यामध्ये पोलीस विभागाचेही मौलिक सहकार्य लाभले तसेच नागरिकांनीही सहकार्य केले त्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Published on : 03-06-2020 16:16:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update