नवी मुंबई महानगरपालिका श्रीगणेशोत्सवाच्या व्यवस्थेसाठी सज्ज
यावर्षीचा श्रीगणेशोत्सव दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या कालावधीत कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असल्याने गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवित महानगरपालिका व पोलीस यंत्रणा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सतर्क आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 84 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन मंडप परवानगी प्राप्त करून घेतली आहे. कोव्हीड 19 च्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक अशा सुरक्षा उपाययोजनांचे पालन करीत उत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले असून आठही विभाग कार्यालयांमार्फत विसर्जन व्यवस्थेची नियोजनबध्द आखणी करण्यात आलेली आहे.
यामध्ये पारंपारिक 23 मुख्य विसर्जन स्थळांच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सुयोग्य व्यवस्था असणार आहेच, यासोबतच विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळली जावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यादृष्टीने 23 मुख्य विसर्जनस्थळांमध्ये साधारणत: 6 पट अधिक वाढ करीत 135 कृत्रिम विसर्जन तलाव सर्व विभागांत तयार करण्यात आले आहेत. यामध्ये, बेलापूर विभागात - 15, नेरूळ विभागात - 27, वाशी विभागात - 16, तुर्भे विभागात - 17, कोपरखैरणे विभागात - 14, घणसोली विभागात - 17, ऐरोली विभागात - 22 व दिघा विभागात - 7 अशा प्रकारे एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलाव असणार आहेत. नागरिकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये आपल्या घरगुती श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विभागांमध्ये मुख्य ठिकाणी होर्डींगव्दारे आणि सोशल मिडियाव्दारे या तलावांच्या स्थळांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र - 3 (Containment Zone - 3) मध्ये राहणा-या नागरिकांकडील श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी या कन्टेनमेंट झोनच्या प्रवेशव्दाराजवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या वतीने श्रीमूर्ती संकलित केल्या जाणार असून त्याचे सुयोग्य पध्दतीने विसर्जन केले जाणार आहे.
श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी दीड, पाच, गौरीसह सहा, सात, दहा अशा पाचही विसर्जनदिनी महानगरपालिका क्षेत्रातील 23 मुख्य विसर्जनस्थळांवर आवश्यक ती व्यवस्था करण्यात येत असून सर्व विसर्जन स्थळांची साफसफाई व त्या परिसरात आवश्यक दुरूस्ती कामे करण्यात आलेली आहेत.
14 मुख्य तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल रचना असून नागरिकांनी याच विशिष्ट ठिकाणी श्रीमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन करतानाच शक्यतो घराजवळच्या कृत्रिम तलावातच श्रीमूर्ती विसर्जन करावे अशी नागरिकांना विनंती करण्यात आलेली आहे.
मुख्य 23 विसर्जनस्थळांवर पुरेश्या विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित असणार आहे.
श्रीमुर्तींच्या विसर्जनकरीता तराफ्यांची / फोर्कलिफ्टची सुविधा करण्यात आली आहे.
विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही सर्व ठिकाणी करण्यात येत असून सुविधा मंच उभारण्यात आले आहेत. तेथे श्रीगणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी व करावयाच्या सूचनांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यरत असणार आहे.
श्रीमूर्ती विसर्जनासाठी 1000 हून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यासोबतच अग्निशमन जवान, लाईफगार्डस् तैनात असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य. विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींगही करण्यात आले आहे.
अशाच प्रकारे 35 कृत्रिम विसर्जन तलावांच्या ठिकाणीही आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी जमा होणा-या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत स्वतंत्र वाहनाव्दारे वाहतुक केली जाणार आहे तसेच प्रकल्पस्थळीही त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी असे यापूर्वीच सूचित करण्यात आलेले आहे. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गणेशोत्सवात गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असल्याने श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे, चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन एकत्रितरित्या निघून करण्यात येऊ नये अशा विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत.
त्यास अनुसरून यावर्षीचा श्रीगणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिकाने आरोग्याचे भान ठेवून 'मी पण कोव्हीड योध्दा' या भूमिकेतून स्वयंशिस्तीचे पालन करावे आणि आरोग्योत्सव स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
Published on : 21-08-2020 15:12:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update