स्वच्छतेत अग्रणी होण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी स्वच्छता कामांमध्ये सक्रीय
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सध्याचे देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने हे ध्येय साध्य करायचेच हा निश्चय करण्यात आला आहे.
त्यादृष्टीने प्रत्यक्ष जागोजागी जाऊन अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले स्वच्छता विषयक पाहणी करीत असून मौलिक सूचना करीत आहेत. तुर्भे विभागाच्या पाहणीनंतर पुढील 4 दिवस इतर विभागांना भेटी देत त्यांनी प्रशासन व परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व संबंधित अधिका-यांसमवेत स्वच्छताविषयक बारकाईने पाहणी केली.
यामध्ये 8 डिसेंबरला नेरूळ विभागात शिवाजीनगर, रमेश मेटल कॉरी, महात्मा गांधी नगर, बोनसरी गांव तसेच एम.आय.डी.सी. परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला. 9 डिसेंबरला सी.बी.डी. बेलापूर परिसरातील विविध सेक्टर्स व रमाबाई आंबेडकर नगर भागाची स्वच्छताविषयक पाहणी करण्यात आली. 10 डिसेंबरला ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर तसेच प्रामुख्याने ई टॉयलेट्सची बेलापूर ते वाशी पर्यंत पाहणी करण्यात आली. 11 डिसेंबरला शिरवणे गावठाण परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला व 12 डिसेंबरला आग्रोळी गाव, अर्बन हट, पारसिक हिल व राहुलनगर परिसराची पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौ-यात सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये जाऊन तेथील स्वच्छतेच्या पाहणीसोबतच त्याठिकाणी उपलब्ध सुविधा व साहित्याचीही पाहणी केली जात असून आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती तसेच स्वच्छता अधिक काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ई टॉयलेट्सही वापरात राहतील अशाप्रकारे त्यांची नियमित स्वच्छता राखली जावी असे निर्देश देण्यात आले.
ब-याच ठिकाणी शौचालयांप्रमाणेच सभोवतालचा परिसर अधिक चांगल्या रितीने स्वच्छ केला जावा असे सूचित करतानाच काही शौचालयाभोवती उपलब्ध असलेल्या पडीक जागांचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. हागणदारी मुक्त शहराचे ओडीएफ डबल प्लस मानांकन शहराला लाभलेले असून ते कायम राखण्यासाठी शौचालयांची स्वच्छता व आतील भागातील कोरडेपणा कायम राखणे, प्रत्येक व्यक्तीने शौचालयाचा वापर करणेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत त्यादृष्टीने सतर्क राहण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
या पाहणी दौ-यात सायन पनवेल हायवेलगत शिरवणे बाजूला समांतर असणारा जमिनीचा पट्टा सुशोभिकरण करण्याच्या तसेच इतरही काही विभागात अशा प्रकारच्या दुर्लक्षित जागांचे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुशोभिकरण करण्याचे अति. आयुक्तांनी सूचित केले. विविध ठिकाणी रंगरंगोटी, म्युरल्स करताना नवनव्या संकल्पनांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तलाव स्वच्छतेमध्ये तलावांचा परिसरही सुशोभित असण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
याशिवाय खड्डेमुक्त रस्ते आणि अडथळामुक्त पदपथ असावेत याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. उड्डाणपूलांची आकर्षक रंगरंगोटी करताना अभिनव संकल्पना राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. नोडमधील सफाईप्रमाणेच गावठाण व झोपडपट्टी भागातील सफाई अधिक चांगल्या रितीने करण्याचे सूचित करतानाच कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा प्रकारे घरातूनच वर्गीकरण केले जाण्यासाठी नागरिकांचे व्यापक व सातत्यपूर्ण प्रबोधन करावे असे सांगण्यात आले. याशिवाय नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीमांचे आयोजन करण्याच्याही सूचना करण्यात आल्या.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी असा प्रयत्न असून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्तांसह इतर अधिकारीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वच्छता कार्यात सहभागी झाल्याने स्वच्छता कार्याला गती आलेली दिसून येत आहे.
Published on : 12-12-2020 15:01:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update