एनएमएमटीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनी सुरक्षित प्रवासी वाहतुकीचा संकल्प
मागील 25 वर्षांच्या वाटचालीत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने केलेली यशस्वी वाटचाल प्रशंसनीय असून विशेषत्वाने कोव्हीड काळात आपत्कालीन सेवेतील कर्मचा-यांना ज्या पध्दतीने परिवहनच्या अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पित भावनेने प्रवासी सेवा दिली ही देशसेवा असल्याचे मत व्यक्त करीत वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. पुरूषोत्तम कराड यांनी रस्ता सुरक्षा अभियान केवळ त्या कालावधीपुरते मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी सुरक्षित प्रवासावर भर देऊया असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या पंचविसाव्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त घणसोली डेपो मध्ये सोशल डिस्टन्सींग व सुरक्षा नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी परिवहन उपक्रमातील वाहतुक सुरक्षा अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. या अनुषंगाने वाहतुकीचे नियम पाळणे हे स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे असून आपण स्वत: सुरक्षित जीवन जगा व बसमधील प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवा असे आवाहन करीत श्री. पुरूषोत्तम कराड यांनी अपघातमुक्त नवी मुंबई हे आपले ध्येय असले पाहिजे व त्याकरिता वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे हे दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले.
याप्रसंगी वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. पुरूषोत्तम कराड यांचेसमवेत सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. नंदकिशोर पाटील व श्री. उमेश मुंडे, परिवहन समिती सदस्य सर्वश्री राजू शिंदे, काशिनाथ पाटील, ॲड. अब्दुल जब्बार खान, समीर बागवान, सुधीर पवार, राजेंद्र इंगळे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, श्री. विवेक अचलकर, श्री. अनिल शिंदे, श्री. उमाकांत जंगले, श्री. सुनिल साळुंखे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगतात परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड यांनी परिवहन उपक्रमाच्या मागील 25 वर्षांचा आढावा घेताना 1996 साली 25 बसेसपासून सुरूवात करून आता 492 बसेसपर्यंत यशस्वी वाटचाल करताना प्रवाशांना समाधानकारक प्रवाशी सेवा पुरविण्यात आपण सर्वांच्या सहकार्याने व प्रयत्नाने यशस्वी झालो याबद्दल आनंद व्यक्त केला. भविष्यात बदलत्या काळाची आव्हाने ओळखून पर्यावरणपूरक बसेस चालविण्यावर भर दिला जाईल अशी सांगतानाच डिझेलचे वाढते भाव लक्षात घेता सीएनजी व इलेक्ट्रिकल बसेसच्या वाढीवर भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जगातील सर्व परिवहन सेवा तोट्यातच चालत असून हा लोकसेवेसाठी चालविला जाणारा उपक्रम असल्याचे स्पष्ट करीत हा तोटा कमी करण्यासाठी राबविल्या जात असलेल्या वाशी डेपोचे वाणिज्यिक रूपांतर यासारख्या विविध बाबींची त्यांनी माहिती दिली. कर्मचारी कल्याणासाठीही परिवहन उपक्रम दक्ष असल्याचे सांगत त्यांनी कर्मचारी हिताय घेतलेल्या व घेण्यात येत असलेल्या विविध निर्णयांबद्दल सांगितले.
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. नंदकिशोर पाटील यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने जागरूक रहावे व अपघाताची वेळच येऊ देऊ नये असे मत मांडले. परिवहन सदस्य श्री. राजू शिंदे, ॲड.अब्दुल जब्बार खान, श्री. समीर बागवान , श्री. सुधीर पवार यांनीही वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत कोव्हीड काळातील समर्पित कामाचा विशेष उल्लेख केला.
याप्रसंगी परिवहन उपक्रमाच्या प्रत्येक आगारातील गुणवंत कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे कोव्हीड काळात समर्पित भावनेने काम करणा-या वाहक, चालकांचाची विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे परिवहन अधिकारी-कर्मचारी यांच्या 10 वी, 12 वी, पदविका, पदवी परीक्षेत उत्तम गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचाही सन्मान करण्यात आला.
Published on : 23-01-2021 14:48:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update