*देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये उंचाविण्यासाठी नवी मुंबई सज्ज*
“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये नवी मुंबई शहरास कालच राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते ‘देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा (3rd Cleanest City in India) राष्ट्रीय बहुमान’ प्राप्त झाला असून आज महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हेच ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून प्रारंभ करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित 'प्रारंभ स्वच्छ सर्वेक्षण 2023’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वच्छतेची नवी दिशा’ या शिर्षकांतर्गत आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून प्रतिकात्मक रितीने स्वच्छताज्योती उजळविण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे यांच्या शुभहस्ते दैनंदिन स्वच्छतेत आपले बहुमोल योगदान देणा-या प्रत्येक विभागातील 2 अशा 8 पुरूष व 8 महिला स्वच्छताकर्मींचा प्रातिनिधिक स्वरूपात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या प्रथम नागरिक असणा-या महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते शहराचा गौरव होणे ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी नागरिकांच्या व स्वच्छताकर्मींच्या समर्पित कामामुळेच शहराचा गौरव झाला असल्याचे सांगितले. हे मानांकन हा सर्व घटकांच्या एकत्रित सहभागाचा परिणाम असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या काळात जसे देशात तृतीय मानांकन संपादन करणारे उत्तम काम झाले ते अधिक उंचाविण्याचा प्रयत्न यापुढील काळात नुकताच पदभार स्विकारलेले आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिल्लीमध्ये हा पुरस्कार स्विकारल्यानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक शहरांचे अधिकारी, पदाधिकारी यांनी भेटून नवी मुंबईच्या स्वच्छताविषयक कामांची प्रशंसा केली व शहराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यामधून देशातील विविध प्रांताच्या नागरिकांना नवी मुंबईच्या कामाबद्दल उत्सुकता असल्याचे दिसून येत असून त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे मत व्यक्त केले. आजपासून सुरू होत असलेल्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' मध्ये 'निश्चय केला, नंबर पहिला' हेच घोषवाक्य नजरेसमोर ठेवून आपण आपल्या स्वच्छतेचा स्तर उंचाविण्यासाठी एकदिलाने काम करूया असे आवाहन त्यांनी केले.
'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये देशभरातील 4360 शहरे सहभागी झाली होती. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविला. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार रेटींग' प्राप्त नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन मिळविणारेही महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.
याशिवाय 'स्वच्छ अमृत महोत्सव' अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 'इंडियन स्वच्छता लीग'मध्ये सुप्रसिध्द संगीतकार गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्या कर्णधार पदाखाली 'नवी मुंबई इको क्नाईट्स संघ' स्थापित करण्यात आला. त्या अंतर्गत विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार 53 हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने राबविण्यात आलेल्या भव्यतम उपक्रमास राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. त्याचप्रमाणे या उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्येही झाली.
या पुरस्कार प्राप्तीच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला प्रारंभ होत असताना या कार्यक्रमात महानगरपालिकेने अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्या कलावंतांचे सादरीकरण उपस्थितांची दाद घेऊन गेले. पूर्वांश शर्मा आणि स्वराली देशमुख यांच्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण निर्मिती केली. प्रशांत भालेराव यांचा नृत्याविष्कार अप्रतिम होता. यावर नमुंमपा शाळा क्र, 49, ऐरोली मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वच्छता दिंडीने कळस चढविला. लहान वयापासून मुलांवर होत असलेल्या स्वच्छता संस्कारामुळे नवी मुंबईचे भविष्य उज्जवल होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान सर्वांची मान उंचाविणारा आहेच शिवाय आपली जबाबदारी वाढविणारा असल्याचे मत व्यक्त करीत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ चा प्रारंभ होत असताना ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबंध्द राहूया असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Published on : 03-10-2022 12:19:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update