मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिवाळी सुट्टीत आयोजित विशेष शिबीराला उत्साही प्रतिसाद
दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिबीराच्या (Diwali Vacation Camp) माध्यमातून मुलामुलींचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी व त्यांचा बौध्दिक स्तर उंचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत 'शालेय विदयार्थ्यांकरिता विशेष शिबीर’ आयोजन करण्यात आलेले असून त्याला मुलांचा मोठया संख्येने उत्साही प्रतिसाद लाभला आहे.
18 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या शिबीरामध्ये बेलापूर विभागात 74, नेरुळ विभागात 76, वाशी विभागात 62, तुर्भे विभागात 108, कोपरखैरणे विभागात 69, घणसोली विभागात 73 व ऐरोली विभागात 94 आणि दिघा विभागात 83 अशाप्रकारे 637 इतक्या मोठया संख्यने विदयार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवीत नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच आयोजित केलेला हा अभिनव उपक्रम यशस्वी केला आहे.
सध्याच्या जगात शिक्षणातील प्रगतीइतकेच व्यक्तिमत्व विकासालाही महत्व प्राप्त झालेले आहे. विविध गुण असलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवत यशस्वी होताना दिसतात. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचे महत्व लक्षात घेऊन दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी अशा प्रकारच्या विशेष शिबीरांचे ठिकठिकाणी आयोजन होताना दिसते. तथापि या शिबीरांचे शुल्क भरणे काही पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे इच्छा असूनही कौशल्य असलेल्या आपल्या मुलांना पालक अशा शिबींरात पाठवू शकत नाहीत.
नवी मुंबई महानगरपालिकेने ही अडचण ओळखून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या सुट्टीत आठही विभागांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारच्या विशेष शिबीरांचे 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, योगा व फिटनेस वर्ग, हस्तकला वर्ग, वक्तृत्व विकास, चित्रकला वर्ग, नाटय वर्ग, नृत्य वर्ग, बाल पुस्तक वाचन अशा विविध उपक्रम सहभागी मुलांकडून हसतखेळत करुन घेण्यात आले. यामुळे मोबाईलच्या स्क्रिनमध्ये अडकलेली उमलती पिढी स्वत: मधील गुणांचा विकास करण्यासाठी दररोज 3 ते 4 तास रमली असून या माध्यमातून शिबीराचा हेतू साध्य झाल्याचे दिसून येत आहे.
या शिबीरामुळे मुलांच्या कलागुणांना संधी उपलब्ध होऊन त्यांच्यामध्ये अंगभूत असलेल्या कलांची जोपासना करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन मार्ग दाखविण्यात आला असून त्यासोबतच कला जोपासता यावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी मदत व्हावी तसेच एकमेकांत देवाण-घेवाण, सहकार्य करण्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता वाढावी याकरीता सकारात्मक प्रयत्न करण्यात आले. या सर्व बाबींना विदयार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने हे शिबीर सर्वार्थाने यशस्वी झाले.
या शिबिरामध्ये सहभागी विदयार्थ्यांना अल्पोपहार देण्यात येत असून यामध्ये सहभागी 6 ते 14 वयोगटातील मुले व्यक्तिमत्व विकासासोबत निर्मळ आनंदाचा अनुभव घेत आहेत. अशाप्रकारे दिवाळी विशेष शिबीर आयोजनातून नवी मुंबई महानगरपालिकेने एक चांगले पाऊल उचलले असून त्याबद्दल विदयार्थी आणि पालकांमार्फत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Published on : 22-11-2023 15:08:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update