“प्लास्टिकमुक्त शाळा” उपक्रमात 1200 किलो प्लास्टिक बाटल्यांचे सकलन
स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला हानी पोहचविणा-या प्लास्टिक प्रतिबंधाकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लक्ष दिले जात असून जनजागृती प्रमाणेच विविध प्रकारच्या मोहीमा राबविल्या जात आहेत. अशाच प्रकारचा ‘प्लास्टिकमुक्त शाळा (Plastic free School)’ हा अभिनव उपक्रम आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली 88 शाळांतील 5 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांत उत्साही सहभाग घेत प्लास्टिक बाटल्यांच्या स्वरुपातील तब्बल 1200 किलो प्लास्टिक जमा केले.
या बाबतच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी निसर्गाला हानीकारक प्लास्टिक रोखण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी आपल्या घरुनच प्लास्टिक बाटल्या गोळा करुन शाळेत आणल्या. संबधित वर्ग शिक्षकांमार्फत शालेय पातळीवर मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली या प्लास्टिक बाटल्यांचे शाळानिहाय संकलन करण्यात आले. या संकलित प्लास्टिक बाटल्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शाळांमधून जमा करुन महानगरपालिकेच्या तुर्भे एमआयडीसीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी पुढील प्रक्रियेसाठी नेले जाणार आहेत.
‘प्लास्टिकमुक्त शाळा (Plastic free School)’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर प्लास्टिक प्रतिबंधाचे संस्कार लहानपणापासूनच करण्यात येत असून या माध्यमातून नवी मुंबईचे स्वच्छ सुंदर व पर्यावरणशील भविष्य घडविण्यात येत आहे.
Published on : 24-07-2024 07:26:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update