‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला उत्साही प्रतिसाद देत असल्याचे दिसत असून महानगरपालिकेच्या वतीने समुह संघटक, आशा वर्कर मोठया प्रमाणात महिलांची भेट घेऊन त्यांना या योजनेची माहिती देत आहेत तसेच त्यांचे अर्जही भरुन घेतले जात आहेत. महिला व बालविकास विभागाच्या नारीशक्ती दूत ॲपव्दारे प्राधान्याने ऑनलाईन अर्ज दाखल करुन घेतले जात असून ऑफलाईन अर्जही लेखी भरून घेतले जात आहेत.
नमुंमपा क्षेत्रातील एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेऊन गतिमान कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले असून त्यानुसार जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहचवून त्यांचे अर्ज भरुन घेतले जात आहेत.
याकामी महिला बचत गटांचीही मदत घेतली जात असून समाज विकास विभागाचे समुह संघटक महिला बचत गटांपर्यंत पोहचून त्यातील पात्र महिलांचे अर्ज भरुन घेत आहेत तसेच त्या महिलांमार्फतही इतर महिलांपर्यंत पोहचून योजनेच्या माहितीचे प्रसारण केले जात आहे. याशिवाय आरोग्य विभागातील आशा वर्कर आपापल्या क्षेत्रातील घरांपर्यंत जाऊन पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
योजनेचे अर्ज भरण्यात महिलांना कोणतीही अडचण येऊ नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच 8 विभाग कार्यालय क्षेत्रातील 111 प्रभागांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून तेथे महिलांचा उत्साही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यासोबतच शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणा-या 226 अंगणवाड्यांमध्येही तेथील अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून आत्तापर्यंत 22 हजारहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केले असून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील एक अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. 1500/- इतकी रक्कम म्हणजेच दरवर्षी रू. 18 हजार रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे अत्यंत सोपी व सहज उपलब्ध होतील अशी ठेवण्यात आलेली आहेत. सदर महिलेने आधारकार्ड सादर करावयाचे असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही, तसेच पांढरे रेशनकार्ड असल्यास अथवा कोणतेही रेशनकार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला यापैकी एक दाखला सादर करावयाचा आहे.
इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरूषासोबत विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.
योजनेचे अर्ज पात्र महिला ह्या स्वत: नारीशक्ती दूत ॲप / पोर्टलववरुन भरू शकतात अथवा नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या नजिकच्या मदत कक्षात अथवा अंगणवाडीमध्येही जाऊन भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
योजनेविषयी कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी अथवा अडचण आल्यास निराकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 9969008088 / 9702309054 / 9372106976 हे मोबाईल क्रमांक जाहीर केले असून याशिवाय शासनाच्या महिला व बालविकास विभागाने 181 हा टोल फ्री महिला हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे. त्यावर नागरिक सहज संपर्क साधू शकतात.
तरी योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी याची नोंद घेऊन नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज करावा अथवा महानगरपालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या मदत कक्षाला भेट देऊन अर्ज दाखल करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 24-07-2024 13:13:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update