नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दक्षतेने सज्ज शहरातील सखल भागात अतिवृष्टी व भरतीच्या काळात साचणा-या पावसाळी पाण्याचा प्रश्न सोडवणुकीकरिता होल्डींग पाँड स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरु असलेली जोरदार पर्जन्यवृष्टी बघता तसेच हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील मदत यंत्रणेस सज्ज राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने देण्यात आले होते.
त्यानुसार आयुक्तांनी सकाळीच महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देत नवी मुंबई शहरातील परिस्थितीचा विभागनिहाय आढावा घेतला आणि संबधित विभागप्रमुखांनी व विभाग अधिकारी यांनी आपल्या क्षेत्रात जाऊन तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशित केले. त्यानुसार सर्व संबधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात विशेषत्वाने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी लक्ष ठेवून होते.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त आदेशानुसार पावसाची स्थिती बघता आज 25 जुलै रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत आले होते ते सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची दक्षता घेण्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांना निर्देशित करण्यात आले होते व दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
दि. 24 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 पासून दि. 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 24 तासात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 67.43 मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये बेलापूर विभागात 52.60 मि.मी., नेरुळ विभागात 33.28 मि.मी., वाशी विभागात 54.10 मि.मी., कोपरखैरणे विभागात 73.15 मि.मी., ऐरोली विभागात 49.50 मि.मी., दिघा विभागात 142 मि.मी इतक्या मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी नोंदीत झालेली आहे.
त्याचप्रमाणे दि. 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 पासून सायंकाळी 4.30 पर्यंत नमुंमपा क्षेत्रात सरासरी 60.41 मि.मी. पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये बेलापूर विभागात 88.60 मि.मी., नेरुळ विभागात 60.20 मि.मी., वाशी विभागात 45.71 मि.मी., कोपरखैरणे विभागात 95.76 मि.मी., ऐरोली विभागात 34.60 मि.मी., दिघा विभागात 37.60 मि.मी इतक्या मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी नोंदीत झालेली आहे.
या मोठया प्रमाणावर सातत्याने पडणा-या पावसाच्या अनुषंगाने तसेच दुपारी 2.51 वा. 4.54 मीटर उंचीची उधाण भरती असल्याने व नवी मुंबई शहर समुद्रसपाटीच्या भरती रेषेपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने त्याच कालावधीत मोठया प्रमाणात पाऊस सुरु राहिल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन विविध समाज माध्यमांतून व्यापक प्रमाणात करण्यात आले होते.
रविवार दि.21जुलै रोजी 24 तासात नवी मुंबई क्षेत्रात सरासरी 139.73 मि.मी. इतक्या मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली होती. या दिवशी दुपारी 12.10 वा. 4.44 मीटरच्या उधाण भरतीच्या काळातच मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे शहरातील काही अतिसखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांच्यासह शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी करत आपत्कालीन मदत कार्याला गती दिली. तसेच सेक्टर 8 ए दुर्गामाता नगर परिसरातील धबधब्याच्या ठिकाणी अडकलेल्या 60 हून अधिक पर्यटकांच्या बचाव कार्याच्या ठिकाणालाही आयुक्तांनी भेट दिली होती.
यानंतर दुस-या दिवशी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांनी संबधित अधिका-यांसह आदल्या दिवशी पाणी साचलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन व तेथील नागरिकांशी संवाद साधून स्थळपाहणी केली व कारणमीमांसा जाणून घेण्याकरिता आढावा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने लक्षात आलेली बाब म्हणजे पावसाळी कालावधीत ज्या होल्डींग पाँडमुळे शहराचे पावसाळी पाण्यापासून रक्षण होते अशा 11 होल्डींग पाँडची पावसाचे पाणी धारण करण्याची क्षमता त्यात मोठया प्रमाणात गाळ जमा झाल्याने व खारफुटींचीही वाढ झाल्याने कमी झालेली आहे.
वास्तविकत: सिडकोमार्फत शहर वसवताना नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीच्या भरती रेषेपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने डच पध्दतीने होल्डींग पाँडची रचना करण्यात आली आहे. या रचनेमुळे पावसाळी कालावधीमध्ये शहरातून येणारे पावसाचे पाणी होल्डींग पाँडमध्ये जमा होते व ओहोटी लागल्यानंतर सदर पाणी होल्डींग पाँडच्या पाईप आऊटलेट मधून खाडीमध्ये जाते. या व्यवस्थेमुळे शहरामध्ये पाणी साचून राहत नाही. तथापि इतक्या वर्षात या होल्डींग पाँडमध्ये मोठया प्रमाणात गाळ जमा होऊन खारफुटींचीही वाढ झाल्याने होल्डींग पाँडची पाणी धारण क्षमता कमी झाल्याने भरतीच्या वेळी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यास होल्डींग पाँड मध्ये पावसाचे पाणी सामाहून घेण्यासाठी जागा नसल्याने ते पाणी शहरातील सखल भागात साचत आहे. सदर होल्डींग पाँड गाळ काढून स्वच्छ करण्याबाबत महानगरपालिकेस आवश्यक परवानगी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर बाब मा. उच्च न्यायालयाच्या पटलावर आहे. नागरिकांना होणारा हा त्रास दूर होण्यासाठी होल्डींग पाँड सफाई करण्याची परवानगी मिळण्याबाबत गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी आणि पर्यावरण विभागास दिलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गटारे सफाई व नालेसफाई करण्यात आलेली असून भरती ओसरल्यानंतर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा ओहोटी सोबत निचरा झालेला आहे. अतिवृष्टीचा काळ आणि भरतीचा काळ जुळून आल्याने व होल्डींग पाँडमधील पावसाचे पाणी साठवणुकीची क्षमता कमी झाली असल्याने शहरात काही सखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
त्या अनुषंगाने दि. 24 जुलै रोजी रात्रभर पडणा-या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा सर्वंच विभागांमध्ये दक्षतेने कार्यरत आहे. तरी नागरिकांनी उद्याही पावसाची स्थिती लक्षात घेऊन अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षाशी अथवा महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी 27567160 / 27567061 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 26-07-2024 12:43:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update