नवी मुंबई महानगरपालिकेच्या दक्षतेने अतिवृष्टीतही नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 24 जुलै रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून 24 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 26 जुलै सकाळी 8.30 पर्यंत 48 तासात सरासरी 165.48 मिमी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामध्ये 25 जुलै सकाळी 8.30 ते 26 जुलै सकाळी 8.30 या एकाच दिवसात सरासरी 98.05 मिमी. इतक्या मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबईत अतिवृष्टी होऊनही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेची मदत यंत्रणा सर्व क्षेत्रात दक्षतेने तैनात असल्याने शेजारच्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात होती व महानगरपालिकेच्या स्वच्छता, आरोग्यासह सर्व सेवाही कार्यान्वित होत्या.
पावसाची संततधार स्थिती पाहून नमुंमपा आयुक्त रात्रीपासूनच सर्व संबंधितांच्या संपर्कात होते. आपत्ती नियंत्रण कक्षातून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्तांसह विभागप्रमुख व सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त हे अधिनस्त कर्मचाऱ्यांसह मदतकार्यासाठी सज्ज होते. स्वच्छता कर्मचारी पावसात स्वच्छतेची कामे करीत होते. घंटागाड्यांमार्फत कचराही वेळेत उचलण्यात आला. त्यामुळे शहरातील स्वच्छता नेहमीसारखी राहिली. आरोग्य यंत्रणाही नागरी आरोग्य केंद्रापासून रूग्णालयापर्यंत सर्वच स्तरांवर दक्षतेने कार्यान्वित होती. ज्या ठिकाणी वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणचे अडथळे दूर करून पावसाळी पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून देण्यात आली.
महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास तसेच विभागीय नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी झाडे अथवा झाडांच्या फांद्या पडल्या आहेत अशा 7 ठिकाणी अग्निशमन दल तसेच आपत्कालीन मदत पथकाने जाऊन रहदारीला होत असलेला अडथळा दूर केला. दोन ठिकाणी आगीच्या किरकोळ घटनांचीही तात्काळ दखल घेऊन अग्निविमोचन कार्यवाही करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त आदेशानुसार पावसाची स्थिती बघता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत आले होते ते सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची दक्षता घेण्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांना निर्देशित करण्यात आले व त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्री जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजीही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
दि. 25 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 पासून दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 8.30 पर्यंत नमुंमपा क्षेत्रात सरासरी 98.05 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये बेलापूर विभागात सर्वाधिक 146.60 मि.मी. तसेच नेरुळ विभागात 98.90 मि.मी., वाशी विभागात 67.70 मि.मी., कोपरखैरणे विभागात 133.30 मि.मी., ऐरोली विभागात 63.80 मि.मी., दिघा विभागात 78.00 मि.मी इतक्या मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी नोंदीत झाली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सकाळीच विविध माध्यमांतून अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्तांच्या वतीने करण्यात आले व महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार सर्व यंत्रणा महापालिका क्षेत्रामध्ये विविध विभागात मदतकार्यासाठी कार्यरत होती. यामुळे जोरदार पाऊस पडूनही नवी मुंबई शहरातील परिस्थिती नियंत्रणात राहिली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
21 जुलै रोजीच्या मुसळधार पावसानंतर महानगरपालिकेमार्फत पाणी साचलेल्या विविध स्थळांची पाहणी करुन पाणी साचण्याची कारणे जाणून घेण्याचा बारकाईने प्रयत्न करण्यात आला. याकरिता त्या स्थळांच्या आसपासच्या नाल्यांची पाहणी करण्यात आली तसेच तेथील स्थानिक नागरिकांशीही संवाद साधण्यात आला.
या पाहणीअंती एक महत्वपूर्ण बाब लक्षात आली ती म्हणजे नवी मुंबई शहर समुद्र सपाटीच्या भरती रेषेपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने शहर वसवताना सिडकोने पावसाचे पाणी सामावून घेण्यासाठी 11 होल्डींग पाँडची रचना केली आहे. तथापि इतक्या वर्षांत या होल्डींग पाँडमध्ये मोठया प्रमाणात गाळ जमा होऊन खारफुटींचीही वाढ झाल्याने होल्डींग पाँडची पाणी धारण क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यास होल्डींग पाँडमध्ये पावसाचे पाणी सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा उरलेली नसल्याने ते पाणी शहरातील सखल भागात उलटे येऊन साचत आहे.
त्यामुळे होल्डींग पाँडमधील गाळ काढून ते स्वच्छ करणे शहराच्या पावसाळी कालावधीतील सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. होल्डींग पाँड स्वच्छतेसाठी महानगरपालिकेस परवानगी मिळावी यासाठी संबंधित प्राधिकरणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर बाब मा.उच्च न्यायालयाच्या पटलावर आहे. हे होल्डींग पाँड स्वच्छतेची परवानगी मिळण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्न करण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.
दि.25 जुलै रोजी दुपारी 2.51 वाजता 4.54 मीटर क्षमतेची उधाण भरती होती. त्या कालावधीत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पाणी साचण्याच्या घटना घडल्याचे आढळून आले नाही. शहरातील काही भागात कमी वेळात अधिक पाऊस पडूनही शहरातील परिस्थिती नियंत्रणात होती.
नवी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पावसाळी कालावधीतील मदत कार्यासाठी सज्ज आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आयुक्तांमार्फत आश्वासित करण्यात आले आहे. नागरिकांच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या अधिकृत समाज माध्यमातून अतिवृष्टी व इतर महत्वाचे संदेश वेळोवेळी जारी करण्यात येत असतात. तरी नागरिकांनी अशा संदेशांमधील सूचनांचे पालन करावे व या पावसाळी कालावधीत पावसाची स्थिती लक्षात घेऊन घराबाहेर पडावे आणि अडचणीच्या प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षाशी अथवा महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी 27567060 / 27567061 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-07-2024 16:15:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update