नवी मुंबईतील युवकांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेव्दारे राज्यातील युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाव्दारे (इंटर्नशिप) रोजगारक्षम करून उद्योगांकरिता कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. याकरिता 5500 कोटी इतक्या निधाची तरतूद करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ 18 ते 35 वयोगटातील युवक घेऊ शकणार असून 6 महिने कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी असणार आहे. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन मिळणार असून १२ वी उत्तीर्णांना रु.६ हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना रु.८ हजार तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना रु.१० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार असून शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 व ग्रामपंचायतीसाठी 1 असे एकूण 50 हजार योजनादूत नेमण्यात येत आहेत.
याकरिता शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https:/rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
याविषयीच्या अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्टनाका, ठाणे (पश्चिम) येथील जुने कोषागार कार्यालयाठिकाणी असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधता येईल. त्या कार्यालयाचा संपर्क दूरध्वनी क्रमांक 022-25428300 हा आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील युवक-युवतींनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 30-07-2024 12:15:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update