*आज 91 लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी उत्साहाने घेतला लसीकरणाचा लाभ *
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. यामध्ये नागरिकांना आपल्या घरापासून जवळच विनात्रास लसीकरण करून घेता यावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार लसीकरण केंद्रांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
आज 30 जुलै रोजी 45 वर्षावरील नागरिकांकरिता लसीचा पहिला डोस उपलब्ध असल्याने नागरिकाना सुलभपणे लसीकरण करता यावे याकरिता आधीच्या 74 लसीकरण केंद्रांमध्ये अधिक 17 लसीकरण केंद्रांची भर घालत 91 लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज सर्वच विभागांतील लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली असल्याने 45 वर्षावरील नागरिकांनी उत्साहाने लसीचा पहिला डोस घेतला. या वाढविलेल्या 17 लसीकरण केंद्रांमध्ये 10 शाळा, 2 समाजमंदिर, 3 ज्येष्ठ नागरिक केंद्रे तसेच 1 रात्र निवारा केंद्र व 1 आर्ट ऑफ लिव्हींग केंद्र यांचा समावेश होता.
45 वर्षावरील नागरिकांनीही सर्वच लसीकरण केंद्रांवर उत्साही उपस्थिती दर्शविली. बेलापूर विभागातील नमुंमपा शाळा क्र. 3 आग्रोळीगांव येथील लसीकरण केंद्रात श्री. पांडुरंग चव्हाण या 97 वर्षांच्या आजोबांनी लसीकरण करून घेतले.
91 लसीकरण केंद्रांमध्ये वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रूग्णालय, वाशी सेक्टर 5 ईएसआयएस रूग्णालयातील जम्बो लसीकरण केंद्र त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रांसह बेलापूर विभागात 10, नेरूळ विभागात 15, तुर्भे विभागात 14, वाशी विभागात 7, कोपरखैरणे विभागात 13, घणसोली विभागात 12, ऐरोली विभागात 10 व दिघा विभागात 4 लसीकरण केंद्रे कार्यान्वित होती.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून https:/www.nmmccovidcare.com या पोर्टलवर दैनंदिन लसीकरणाची सविस्तर माहिती केंद्रांवर असलेल्या उपलब्ध डोसच्या संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी प्रसिध्द केली जात आहे. त्यासोबतच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप अशा सोशल मिडियावरूनही दैनंदिन लसीकरणाची माहिती प्रसारित केली जात आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी या माध्यमांतून प्राप्त होणा-या माहितीनुसार आपले लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे असे कोव्हीड प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन ही आपली दैनंदिन सवय करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 30-07-2021 16:24:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update