13 एप्रिलला कर्तृत्ववान तरूणाई सांगणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानविचारांचे महत्व
सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील व्याख्यानमाला हा आता वैचारिकता जपणा-या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला असून बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर’ शिर्षकांतर्गत व्याख्यानमालेला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
यावर्षी ‘जागर 2023’ मध्ये श्री. राजीव खांडेकर, श्री. नामदेव काटकर (अंजना) आणि डॉ. नरेंद्र जाधव या तिन्ही मान्यवरांच्या व्याख्यानांना श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भरगच्च भरलेल्या सभागृहाच्या बाहेर लावलेल्या एलईडी स्क्रीन समोरही व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
जागर व्याख्यानमालेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नामवंत व्याख्यात्यांप्रमाणेच नव्या पिढीचे युवा प्रतिनिधी असणा-या व्याख्यात्यांनाही याठिकाणी विचारपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. गतवर्षी ‘आम्ही वाचलो - तुम्हीही वाचा’ या विषयावर 5 युवा व्याख्यात्यांनी आपले विचार मांडले होते.
यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवार, दि.13 एप्रिल 2023 रोजी, सायं. 6 वाजता, युवा व्याख्यात्यांच्या विशेष सुसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये विविध क्षेत्रात स्वत:चे कर्तृत्व गाजविणारे युवा पिढीचे 6 प्रतिनिधी आपापल्या क्षेत्रातील अनुभव कथन करीत त्यांच्या यशोवाटचालीतील ज्ञानाला महत्व देणा-या बाबासाहेबांच्या विचारांचे महत्व अधोरेखीत करणार आहेत.
या सुसंवादात श्री. निरज टकसांडे, श्री. प्रफुल्ल शशिकांत, श्री. आनंद इंगळे, श्री. प्रवीण निकम, श्री. अविनाश उषा वसंत आणि डॉ. पद्मजा राजगुरू हे 6 युवा व्याख्याते ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या विषयास अनुसरून श्रोत्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
तरी विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या युवा पिढीचे नवे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-04-2023 13:47:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update