2500 हून अधिक नागरिकांची ऐरोली, तुर्भे विभागात कोव्हीड 19 मास स्क्रिनींग
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने ज्या भागांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण सापडले आहेत अशा कन्टेनमेंट झोनमध्ये मास स्क्रिनींगव्दारे नागरिकांची कोव्हीड 19 विषयक तपासणी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 26 मे पासून विविध विभागात करण्यात येत आहे. आजही ऐरोली, तुर्भे विभागांमध्ये 5 ठिकाणी 2551 नागरिकांचे मास स्क्रिनींग करण्यात आले आहे.
संबंधीत नागरी आरोग्य केंद्रांसह डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय, तेरणा रुग्णालय व अमृत प्रेरणा सेवाभावी संस्था यांची वैद्यकीय पथके यांच्याव्दारे हा मास स्क्रिनींग उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात असून डॉक्टरांकडून नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी केली जात आहे. तसेच त्यांच्याशी संवाद साधला जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती जाणून घेत औषधे दिली जात आहेत.
चिंचपाडा ऐरोली येथील मास स्क्रिनींगमध्ये 247 नागरिकांची कोव्हीड 19 च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली व 2 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासह तेरणा रुग्णालयाचा वैद्यकीय समुह सहभागी होता.
सेक्टर 1 ऐरोली येथे स्थानिक नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 196 नागरिकांची कोव्हीड 19 तपासणी केली व 5 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले. डॉ. डि.वाय.पाटील रुग्णालयाच्या आणखी 2 वैद्यकीय समुहाने संबंधीत नागरी आरोग्य केंद्रासह सेक्टर 20 तुर्भे येथे 94 व सेक्टर 26 कोपरीगांव येथे 304 नागरिकांची कोव्हीड 19 विषयक तपासणी केली.
हनुमान नगर तुर्भे येथील मास स्क्रिनींगमध्ये 1710 नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये तेथील नागरी आरोग्य केंद्रासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्था यांचे वैद्यकीय समुह सहभागी होते.
अशाचप्रकारे उद्या दि. 10 जून रोजीही ऐरोली विभागात दिवागांव, सेक्टर 3 व सेक्टर 6, 7, 8 भागात आणि बिंदूमाधव नगर दिघा अशा 4 ठिकाणी मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहेत.
अधिक संख्येने कोरोना बाधीत साप़डलेल्या भागांमध्ये मास स्क्रिनींग शिबीरे राबविली जात असून त्यामधून कोव्हीड 19 ची लक्षणे दिसणा-या व्यक्तींवर त्वरीत उपचार करणे शक्य होत आहे व याव्दारे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी निश्चितच उपयोग होणार आहे. तरी नागरिकांनी संसर्गातून पसरणा-या कोव्हीड 19 च्या विषाणूपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सींगचेही काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-06-2020 13:23:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update