27 डिसेंबरपासून नवी मुंबईत दिघा तलावाजवळून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला प्रारंभ नागरिकांना यात्रेमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आवाहन
समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी पंतप्रधान ना.श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शुभारंभ बुधवार दि. 27 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 10.30 वा. दिघागाव तलावाजवळ संपन्न होत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेसाठी केंद्र सरकार मार्फत नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील 45 स्थळे निश्चित करण्यात आली असून दररोज सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात 23 दिवस ही यात्रा नवी मुंबईतील आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध ठिकाणी जनजागृती करणार आहे व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणार आहे.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने यात्रेचे काटेकोर आयोजन केले असून 27 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. पहिला कार्यक्रम दिघा तलावाजवळ व दुस-या सत्रातील कार्यक्रम दिघा विभाग कार्यालयाजवळ संपन्न होणार आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती व त्याचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचून दिला जाणार आहे. यामध्ये पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध योजनांचा समावेश आहे.
शासनामार्फत डिजीटल स्क्रिन असलेली सुसज्ज व्हॅन या करिता महानगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात येत असून भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ हे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान व्यापक स्वरुपात राबविले जात आहे. यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा यादृष्टीने विभाग कार्यालय पातळीवर प्रयत्न केले जात आहे.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या उपक्रमासाठी शासनाकडून उपलब्ध करुन दिल्या जाणा-या जनजागृतीपर प्रचार वाहनाचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल –
दि. 27 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – दिघा तलाव (हिंदमाता विद्यालय)
दि. 27 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – दिघा विभाग कार्यालय
दि. 28 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – नमुंमपा शाळा, यादव नगर
दि. 28 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – ऐरोली गावदेवी मंदिराजवळ
दि. 29 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – इच्छापूर्ती गणेश मंदिर, से.15, ऐरोली
दि. 29 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – ॲपल हॉस्पिटल जवळ, से.8ए, ऐरोली
दि. 30 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – ऐरोली विभाग कार्यालय
दि. 30 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – नमुंमपा शाळा क्र.55 आंबेडकर नगर, रबाळे
दि. 31 डिसेंबर – सकाळी 10.30 ते 1.00 – सिडको मैदान, गोठिवली
दि. 31 डिसेंबर – दुपारी 3.00 ते 5.30 – नमुंमपा मैदान से.06 घणसोली
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून देशातील प्रत्येक गाव व शहरामध्ये केंद्र सरकार, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने लोककल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती व त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करीत असून नागरिकांनी 18 जानेवारीपर्यंत चालणारी ही यात्रा आपल्या क्षेत्रात येईल तेव्हा त्यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-01-2024 09:02:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update